
अनेकांना दूध प्यायला आवडतं. दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थही अनेकजण चवीने खातात. दुसरीकडे चहामध्येही लाखो लोक दूध टाकतात. परंतु काही ठिकाणी भेसळयुक्त दूध विकले जाते. थोड्याशा नफ्यापाई केलेल्या या कांडामुळे अनेकदा लोकांचा जीव जातो. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागात फेब्रुवारी महिन्यापासून भेसळयुक्त दूध विकले जात होते. त्या भागात फेब्रुवारीपासूनच लोक आजारी पडत होते. भेसळयुक्त दूध पिल्यामुळे त्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी, लघवी बंद होणे, मूत्रपिंड निकामी होणे अशा प्रकारचा त्रास जाणवत होता. सुरुवातीला 22 फेब्रुवारी रोजी अशा काही तक्रारी समोर आल्या. नंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच भागात असलेल्या एका डेअरीमधून भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचे समोर आले. या भेसळयुक्त दूधात एथिलीन गायकॉल नावाचा विषारी पदार्थ मिसळला जात होता. याच भेसळीमुळे 20 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल झाले होते. यात लहान मुलं, वृद्ध यांचाही समावेश होता. यातील 16 जणांचा मृत्यू जाला आहे. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोदावरी जिल्ह्यातील नरसापूरम गावाताली डेअरीमधून हे दूध विकले जात होते. 100 पेक्षा जास्त कुटुंबांना या डेअरीमधून दूध देण्यात आले होते. दूध पिल्यानंतर काही तासांनीच लोकांची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर रुग्णांना डायलॅसिस, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान आयसीयूत असलेल्या रुग्णांवर उपचार केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आरोपींना लवकरत लवकर कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.