दिल्लीत वेगवान घडामोडी; महाविकास आघाडीचे नेते अमित शाह यांच्या भेटीला; सीमावादावर खलबतं

| Updated on: Dec 09, 2022 | 12:05 PM

सकाळीच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी या खासदारांनी मोदींकडे सीमा प्रश्नावर चर्चा केल्याचं सांगितलं जातं.

दिल्लीत वेगवान घडामोडी; महाविकास आघाडीचे नेते अमित शाह यांच्या भेटीला; सीमावादावर खलबतं
दिल्लीत वेगवान घडामोडी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि कर्नाटका दरम्यान सीमा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आता हा प्रश्न दिल्ली दरबारी गेला आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांनी याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर लागलीच आता महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे खासदार थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

या भेटीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची तक्रारही केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. बोम्मई यांनी जत तालुक्यातील तलावात पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचलं आहे. तसेच महाराष्ट्रातील काही गावांवर दावाही सांगितला आहे. दोन राज्यातील सीमा प्रश्नांचा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाही बोम्मई यांच्याकडून कुरापती केल्या जात असल्याने त्यांची तक्रार शाह यांच्याकडे केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळीच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी या खासदारांनी मोदींकडे सीमा प्रश्नावर चर्चा केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता मविआचे नेते शाह यांना भेटणार असल्याने या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, येत्या 19 डिसेंबर रोजी कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या दिवशीच अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकात महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. या महामेळाव्याला उपस्थित राहण्याची हाकच एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते या महामेळाव्याला जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.