हत्तीची अंघोळ घालणं पडलं महागात, सोंडेनं उचलून आपटलं, जागीच मृत्यू

केरळमधील हत्ती पुनर्वसन केंद्रात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जी ऐकून तुमच्या देखील अंगावर काटा येईल. जाणून घ्या सविस्तर.

हत्तीची अंघोळ घालणं पडलं महागात, सोंडेनं उचलून आपटलं, जागीच मृत्यू
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 05, 2026 | 4:19 PM

Kerala Mahout Death : केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नय्यर धरणाजवळ असलेल्या या पुनर्वसन केंद्रात एका हत्तीने 27 वर्षीय महावताचा जीव घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महावत रोजच्या दिनक्रमानुसार संबंधित हत्तीला आंघोळीसाठी जलाशयाच्या दिशेने नेत होता. मात्र, याच वेळी अचानक हत्ती उग्र झाला. अशातच त्या हत्तीने कसलाही विचार न करता थेट आपल्या सोंडेने महावताला जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे महावत थेट जलाशयात पडला. पाण्यात पडल्यामुळे तो गंभीर अवस्थेत गेला आणि बुडाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली.

उपचारापूर्वीच महावताचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पुनर्वसन केंद्रातील अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करत महावताला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मृत महावत गेल्या काही वर्षांपासून कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात कार्यरत होता. त्याला हत्तींची देखभाल आणि व्यवस्थापनाचा चांगला अनुभव होता. त्यामुळे अनुभवी महावतासोबत अशी दुर्घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

केंद्रात भीतीचे वातावरण, तपास सुरू

या घटनेनंतर पुनर्वसन केंद्रातील अन्य कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पोलीस आणि वन विभागाने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हत्ती अचानक का उग्र झाला, सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी होत्या का, तसेच नियमांचे पालन झाले होते का, यासह सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, एका तरुण महावताच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.