मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; शस्त्रास्त्रे जप्त
Jammu Kashmir News : बारामुल्ला जिल्ह्यातील चंदोसा परिसरात सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील चंदोसा परिसरात सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. नीलसर कांडी भागात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसह 52 राष्ट्रीय रायफल्स, CRPF ची 53 वी बटालियन आणि SSB ची 2 री बटालियन सहभागी झाली होती. सुमारे सहा तास चाललेल्या शोधमोहीमेत मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान मोठा शस्त्र साठा जप्त
दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना RPG साठी वापरले जाणारे 14 सोव्हिएत निर्मित OG-7V फ्रॅगमेंटेशन राउंड्स सापडले. हे प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. याशिवाय हिरव्या प्लास्टिक ट्यूबमध्ये ठेवलेले 9 PG-7P प्रोपेलेंट चार्जेस किंवा बूस्टर्सही जप्त करण्यात आले. ही युद्धसामग्री अत्यंत धोकादायक मानली जाते आणि मोठ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी तिचा वापर होऊ शकला असता. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडने (BDDS) घटनास्थळीच सर्व साहित्याची तपासणी करून सुरक्षा नियमांनुसार ते नष्ट केले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
आता या प्रकरणी चंदोसा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 4/5 आणि आर्म्स अॅक्टच्या कलम 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे स्फोटक साहित्य कुठून आणले गेले आणि त्यामागील दहशतवादी नेटवर्क कोणते आहे, याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
दहशतवादमुक्त काश्मीरकडे वाटचाल
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. राजौरी जिल्ह्यातील पीर पंजाल भागातही सुरक्षा दलांनी जंगल परिसरात दहशतवाद्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. चंदोसा येथील यशस्वी कारवाईमुळे सुरक्षा दलांचे मनोबल वाढले असून स्थानिक नागरिकांमध्ये दहशतवादमुक्त काश्मीरची आशा अधिक मजबूत झाली आहे. प्रशासनाने परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करून सतर्कता वाढवली आहे.