Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
Manoj Jarange Patil : "अरे पण तुझे पोरगं पोरगी शिकत असेल न, तुम्ही इतक्या आहारी नका जाऊ पक्षाच्या, नीतिमत्ता जरा तुमची जागेवर ठेवा. तुम्हाला कशात बी राजकारण शोधायचं विद्यार्थ्यांचा राजकारण मराठ्याच्या आरक्षणात राजकारण. दोन-दोन, चार-चार वर्षे प्रयत्न करायचे आणि पेपर लीक व्हायचा. त्यावेळेस त्या पोरांची मनस्थिती काय होती ते घरी जाऊन विचार जरा" अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. रवाना होण्याआधी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. “का घरी बसावं सगळ्यांनी? आम्ही तर या दोन-तीन दिवसातील सगळे दौरे रद्द केले. जर न्यायासाठी लेकरं लढत असतील तर, आम्ही भविष्यासाठी भांडतोय, राजकारण तुमचं तिकडे जळू द्या, राजकारण तुम्हीच करा. सत्ताही तुम्हीच भोगा पण न्यायासाठी आम्ही लढत असताना जर क्रूर पणाने हल्ला केला गेला तर या देशातील लोकांनी शांत नाही बसलं पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पक्ष कोणताही असला तरी तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा तुमचा मुलगा, मुलगी आहे. एक माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती, सत्तेची ती कोणालाच मोजत नाही. एकदा आल्यावर त्यांच्या हे लक्षात नाही हेच लोक पाडून टाकणारे आहेत” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेवर बोलले की, “अरे बाबा आम्हालाही तेच केलं होतं अंतरवालीत, गाड्या त्यांनीच फोडल्या. महिलांनी रक्त बंबाळ त्यांनीच केलं, गोळ्या पण त्यांनीच घातल्या म्हणजे ते बोलतील ते खरं का? याच्यासाठी सत्तेवर बसलेले नाही, मोदी साहेबांनी तरी याच्या वरती लक्ष दिले पाहिजे, एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं असेल लाठीचार्ज करायचा हल्ला करायचा” “कुणीतरी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. आपण काय आरोप करतोय, ते गरीबाची पोरं. ते सोनंजी त्यांचे किती वय आहे, ते उपोषणाला बसले, अशांना फरपटत न्यायचं मग लोकांच्या मनातून उतरत. एकदा जर मनातून उतरलं तर खाली खेचायला वेळ नाही लागतं. आता ते हल्ले कसे करतात त्यांना समजेल. महाराष्ट्रात जनता त्यांना कशी फिरू देईल” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
त्यांनाच तुम्ही पायाखाली तुडवणार
“एक धुंदी असते याच लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. आज लोकांना मार खावा लागतो न्यायासाठी, जे उद्याचे अधिकारी आहेत या देशाचे भविष्य आहे, त्यांनाच तुम्ही पायाखाली तुडवणार. आता ते पुन्हा तुम्हाला कसे सत्तेवर येऊ देतील” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम कधीपासून यायला लागलं
“कालचा हल्ला आम्हाला सहन झाला नाही, त्या मुली इतक्या रडायला लागल्या तरी सुद्धा या देशातील जनता घरी कस काय बसू शकते. तुम्हाला लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम कधीपासून यायला लागलं हा प्रश्न मोठा आहे. सोनमजीची आपण विचारपूस केली पाहिजे जे विद्यार्थी जखमी झाले, त्यांची सुद्धा विचारपूस केली पाहिजे. आमचा 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. आम्ही मराठवाड्यातला दौरा रद्द करून तातडीने दिल्लीकडे निघालो आहोत” असं मनोज जरांगे पाटील बोलले.