मोहन भागवत यांचे LGBTQ समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले; ‘अशा प्रकारचे लोक…’
Mohan Bhagwat on LGBTQ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. यासोबत त्यांनी इतर लोकांना या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन केले आहे.

LGBTQ समाजाकडे काही लोक हे हीन भावनेने पाहतात, ते समाजापासून वेगळे आहेत असा त्यांचा समज असतो. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. ‘LGBTQ समुदायातील लोकही समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांना सन्मानाने तसेच समानतेने समाजात स्थान मिळाले पाहिजे. अशा प्रकारचे लोक आपल्या समाजातही आहेत. त्यापैकी काही जण जन्मतःच तसे असतात, अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती किंवा इतर कोणीही काही करू शकत नाही, कारण ते जन्मतःच तसे असतात असं भागवत यांनी म्हटलं आहे.
हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘जेव्हा संपूर्ण जगात असे लोक आहेत, तेव्हा भारतात असे कधीच नव्हते असे म्हणता येणार नाही. आपल्या समाजातही असे लोक पूर्वीपासून आहेत आणि आपल्या परंपरेने त्यांच्या अस्तित्वाला मान्यता दिली आहे. काही प्रकरणांमध्ये बदल शक्य असू शकतो, मात्र जिथे तो शक्य नाही, तिथे हे समजून घेणे आवश्यक आहे की तेही माणसे आहेत आणि त्यांनाही सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.**
भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘त्यांना समाजापासून वेगळे केले गेले नाही, उलट सामाजिक जीवनात त्यांच्यासाठीही स्थान राखले गेले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडे हीनभावनेने पाहू नये. आजही या समुदायाचे स्वतःचे देव, धार्मिक स्थळे आणि महामंडलेश्वर आहेत. ते कुंभमेळ्यातही सहभागी होतात. या विषयावर अनावश्यक गदारोळ करण्याऐवजी आपल्या परंपरेत अशी व्यवस्था करण्यात आली की समाजाने त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि स्वीकाराची भावना ठेवावी. त्यांना समाजापासून वेगळे न मानता समाजाचाच एक भाग म्हणून स्थान देण्यात आले.’
पालकांनी मुलांना समजून घ्यावे
मोहन भागवत यांनी नव्या पिढीबाबतही भाष्य केले आहे. आपल्याला नव्या पिढीत जे गुण आणि संस्कार पाहायचे आहेत, ते सर्वप्रथम आपण स्वतःच्या आचरणातून दाखवले पाहिजेत.मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना समजून घ्यावे आणि प्रेमाने संवाद साधावा. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी त्यांच्याशी समजुतीने वागणे आवश्यक आहे. समाजात ज्या बदलाची आपण अपेक्षा करतो, त्याची सुरुवात सर्वप्रथम स्वतःपासून झाली पाहिजे असं आवाहन त्यांनी पालकांना केले आहे.