Kangana Ranaut : कागदच नाही तर अमित शाहांवर दगड भिरकावले, कंगना राणौतचा विरोधकांवर त्या आरोपांनी खळबळ, लोकसभेत घडलं काय?

BJP MP Kangana Ranaut : काल 130 व्या घटनादुरुस्तीवरून संसदेत मोठा गदारोळ दिसून आला. पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यात घरी पाठवण्याच्या या बिलावरून मोठे रणकंदन सुरू आहे. त्यावर कंगना राणौतने मोठे वक्तव्य केले आहे.

Kangana Ranaut : कागदच नाही तर अमित शाहांवर दगड भिरकावले, कंगना राणौतचा विरोधकांवर त्या आरोपांनी खळबळ, लोकसभेत घडलं काय?
कंगना राणौत
| Updated on: Aug 21, 2025 | 11:09 AM

लोकसभेत बुधवारी, 20 ऑगस्ट 2025 रोजी मोठा गदारोळ झाला. काल 130 व्या घटनादुरुस्तीवरून विरोधक आक्रमक दिसले. पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यात घरी पाठवण्याच्या या बिलावरून मोठे रणकंदन सुरू आहे. विरोधकांनी या बिलाची प्रत फाडत ती गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने भिरकावली. त्यावर मंडी येथील खासदार कंगना राणौतने मोठे वक्तव्य केले आहे.

विरोधकांनी भिरकावले दगड

कंगना राणौतने विरोधकांवर हल्लाबोल केला. संसदेत जे काही झाले, ज्या प्रकारचे दृश्य आम्ही पाहिले. ते कोणत्याही सभ्य समाजासाठी लाजिरवाणे आहे. जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभेत बिल सादर करत होते. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाच्या प्रती फाडून त्या अमित शाह यांच्या दिशेने भिरकावल्या. याशिवाय काही खासदारांनी तर कहर केला. ते दगड घेऊन आले होते. त्यांनी गृहमंत्र्यांना दगड मारल्याचा खळबळजनक दावा कंगना राणौत हिने केला. जेव्हा विरोधी पक्ष संसदेत हिंसा करत होते. तेव्हा आमच्या पक्षातील सर्वच नेत्यांनी मोठ्या संयमाचे दर्शन घडवले. पण संसदेत असे प्रकार किती दिवस सुरू राहतील, हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे कंगना म्हणाली.

अमित शाह यांच्याकडून सादर बिल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी मान्सून सत्रात लोकसभेत 130 वी घटना दुरुस्ती बिल सादर केले होते. या बिलानुसार, जर पंतप्रधान,केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्री सलग 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल अथवा त्यांना पद मुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

विरोधकांचा सरकारवर भरवसा नाय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जसे हे बिल सादर केले. तेव्हा विरोधकांनी एकच हंगामा सुरू केला. विरोधी बाकड्यांवरील नेत्यांनी हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. या विधेयकावर विरोधकांना संशय आहे. हे विधेयक घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हे विधेयक राज्यात आणि देशातील राजकीय संस्थांकडून गैरवापर करण्याचा दरवाजाच उघडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.