भारताने करून दाखवलं; चीन-जपानही पाहतच राहिले, बुलेट ट्रेनचा धोकादायक टप्पा पार, कधीपासून सुरु होणार?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पा अंतर्गत भरूचमध्ये रेल्वे रुळांवर १३० मीटर लांबीचा स्टीलचा पूल यशस्वीरित्या बसवला आहे. १०० वर्षे टिकणाऱ्या या पुलाचे वजन २९०० टन असून पुढील वर्षी १५ ऑगस्टला पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.

देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच भारतीयांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आता अतिशय वेगाने पुढे सरकत आहे. या मार्गातील एक खूप मोठा आणि अवघड टप्पा नुकताच यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. गुजरातच्या भरूच जवळील त्रालसी गावाजवळ, धावत्या रेल्वे रुळांच्या अगदी वरून १३० मीटर लांबीचा एक अवाढव्य स्टीलचा पोलादी पूल यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. शनिवारी १६ मे २०२६ रोजी हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले.
विशेष म्हणजे, हा पूल ज्या रुळांवरून गेला आहे, तिथून भारतीय रेल्वेच्या गाड्या आणि मालवाहू गाड्यांची (फ्रेट कॉरिडॉर) मोठी वाहतूक असते. याआधी मार्च २०२६ मध्ये याच भागात १०० मीटरचा असाच एक पूल बसवण्यात आला होता. हा पूल जमिनीपासून १४ मीटर उंचीवर एका तात्पुरत्या सांगाड्यावर तयार करण्यात आला. त्यानंतर एका विशेष स्वयंचलित (ऑटोमॅटिक) मशीनच्या साहाय्याने तो हळूहळू पुढे सरकवून पिलरवर घट्ट बसवण्यात आला. या १३० मीटरच्या भागाचे वजन तब्बल २,९०० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे २९ लाख किलो इतके आहे.
हा पूल मजबूत ठेवण्यासाठी या १३० मीटरच्या तुकड्यात तब्बल १ लाख २१ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात अतिशय मजबूत बोल्ट्स फिट करण्यात आले आहेत. या पुलाचे लोखंडी भाग गुजरातच्या उमरगाव येथील कार्बन फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले आहेत. या पुलाची रचना अशी आहे की, तो कमीत कमी १०० वर्षे सुरक्षितपणे टिकेल. या पुलाची एकूण लांबी ३३० मीटर इतकी आहे. त्यापैकी २३० मीटरचे काम आता पूर्ण झाले असून, उरलेल्या १०० मीटर पुलाचे काम आता थेट त्याच जागेवर केले जाणार आहे. जेव्हा हा पूर्ण पूल तयार होईल, तेव्हा त्याचे एकूण वजन ६,१०० मेट्रिक टन इतके असेल.
यावेळी रेल्वे रुळांवरून मालगाड्या धावत असल्याने हे काम करणे खूप धोक्याचे होते. त्यामुळे मालगाड्यांच्या वाहतुकीचे वेळापत्रक थोडे बदलून, विशेष सुरक्षेसह ट्रॅफिक ब्लॉक घेऊन हे काम अत्यंत सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आले.
आतापर्यंत तब्बल 14 पुलांचे काम पूर्ण
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावण्यासाठी संपूर्ण मार्गावर एकूण २८ स्टीलचे पूल बांधले जाणार आहेत. यापैकी १७ पूल गुजरातमध्ये आहेत आणि त्यातील १४ पुलांचे काम आता पूर्ण झाले आहे. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की, पुढील वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२७ रोजी देशातील पहिली बुलेट ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल. तत्पूर्वी, गुजरातच्या सुरत ते बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेनची पहिली चाचणी घेतली जाईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
या भागातील ट्रॅक टाकून झाला असून, आता विजेच्या तारा (OSE) आणि आवाज रोखणाऱ्या भिंती (Noise Barriers) बांधण्याचे काम सुरू आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाची पाहणी केली आहे. ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गावर एकूण १२ स्टेशन्स असतील, यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या काही तासांवर येणार आहे.