नेत्यांची ‘चमचेगिरी’ काँग्रेसला पडणार भारी; थेट महिला आयोगानेच दिली नोटीस

| Updated on: Oct 06, 2022 | 3:07 PM

देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या महिलेबाबत असे शब्द वापरल्याबद्दल महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता महिला आयोगाने उदित राज यांच्या नावाने नोटीस काढली आहे.

नेत्यांची चमचेगिरी काँग्रेसला पडणार भारी; थेट महिला आयोगानेच दिली नोटीस
Follow us on

नवी दिल्लीः राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रतिमा बदलासाठी दक्षिण भारतातून एल्गार पुकारला असतानाच दुसरीकडे मात्र पक्षातील नेतेच काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते उदित राज (Udit Raj) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबद्दल ‘चमचेगिरी’ हा शब्द वापरल्याने ते अडचणीत आले आहेत. चमचेगिरी या शब्दामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संधीचा फायदा उठवत भाजपनेही या शब्दाचा संबंध थेट काँग्रेस पक्ष (Congress Party) आदिवासी आणि महिलांविरोधातील मानसिकतेचा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या महिलेबाबत असे शब्द वापरल्याबद्दल महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता महिला आयोगाने उदित राज यांच्या नावाने नोटीस काढली आहे. त्यामध्ये त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उदित राज यांचे हे वक्तव्य ‘अत्यंत आक्षेपार्ह’ असल्याचे ट्विटरला म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवरुनही याबद्दल लिहिले आहे.

देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या आणि आपल्या कष्टाने त्या टप्प्यावर गेलेल्या महिलेविरोधात असे शब्द वापरणे म्हणजे अतिशय आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता उदित राज यांनी माफी मागण्यासही सांगितले आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उदित राज यांच्या या बेताल वक्तव्याबद्दल बोलताना त्यांच्यासह पक्षावरही टीका केली आहे. त्याबद्दल ते म्हणाले की, उदित राज यांनी वापरलेले हे शब्द अत्यंत दुर्देवी आहेत.

मात्र काँग्रेसकडून अशी बेताल वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. उदित राज यांच्या प्रमाणेच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही या प्रकारची वक्तव्य केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच गुजरातला भेट दिली होती. त्यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी देशातील 76 टक्के मीठ गुजरातमध्ये तयार होत असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सर्व भारतीय गुजरातचे मीठ खातात असंही त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांच्या या मतामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली.

द्रौपदी मुर्मू यांनी मीठाविषयी वक्तव्य केल्यानंतर मात्र त्यांच्या या विधानावर उदित राज यांनी बुधवारी एक टिप्पणी केली, त्यामध्ये ते म्हणाले की, कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती मिळू नये.

चमचेगिरीलाही काही मर्यादा असते असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. आहेत. त्या म्हणतात की, 70 टक्के लोक गुजरातचे मीठ खातात, मात्र स्वत: मीठ खाल्ले तर जीवन समजणार असंही त्यांनी वक्तव्य केले आहे.