Odisha Train Accident : दैव बलवत्तर असेल तर… अपघात झालेल्या ट्रेनखाली दोन दिवस अडकला, अखेर भावानेच केली 10 वर्षाच्या चिमुरड्याची सुटका

| Updated on: Jun 05, 2023 | 6:13 PM

बालासोर जवळील भोगराई येथील दहा वर्षीय चिमुरडा रेल्वे अपघातानंतर बराच काळ ढिगाऱ्याखाली अडकला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. शनिवारी गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या मोठ्या भावाने त्याला वाचवले.

Odisha Train Accident : दैव बलवत्तर असेल तर... अपघात झालेल्या ट्रेनखाली दोन दिवस अडकला, अखेर भावानेच केली 10  वर्षाच्या चिमुरड्याची सुटका
odisha
Image Credit source: socialmedia
Follow us on

कटक : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Odisha railway accident) 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर हजारांहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला. घटनास्थळावरील परिस्थिती अतिशय भयानक होती. मात्र, तब्बल 51 तासांच्या मेहनतीनंतर रुळांवरील डबे, मृतदेह व विखुरलेले सामान हटवण्यात आले असून पूर्ववत स्थिती झाली आहे व पुन्हा रुळावरून गाड्यांची वाहतूक सुरू झाली. या दुर्घटनेत असे अनेक जीव गेले, ज्यांच्या जगण्याच्या कहाण्या अतिशय हृदयस्पर्शी आहेत. अशीच एक कथा एका दहा वर्षांच्या मुलाची आहे, ज्याचा जीव मोठ्या कष्टाने वाचला. त्याचे दैव बलवत्तर होते म्हणून दोन दिवसांनी त्याच्या भावाला तो सापडला.

बालासोर येथील भोगराई येथील दहा वर्षीय देबाशीष पात्रा हा या रेल्वे अपघातानंतर जखमींपैकी एक. तो बराच काळ सहा-सात मृतदेहांच्या खाली अडकला होते. त्याच्या कपाळावर व चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या. शनिवारी गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या मोठ्या भावाने त्याला वाचवले. देबाशिष हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून त्याच्यावर एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागात उपचार सुरू आहेत. तो शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेसने कुटुंबीयांसह भद्रक येथे जात होता.

देवाशिषने दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या वडिलांनी भद्रक येथे जाण्यासाठी कोरोमंडल एक्सप्रेसची तिकिटे काढली होती. तिथे काका आणि काकू आम्हाला घेण्यासाठी थांबले होते. तिथून आम्ही सगळ्यांनी पुरीला जायचा प्लॅन केला. माझे वडील, आई आणि मोठा भाऊ यांनी सहलीची योजना आखली होती आणि आम्ही सर्वजण एकत्रच प्रवास करत होतो.”

“शुक्रवारी संध्याकाळी ट्रेन बालासोरहून निघाली तेव्हा मी माझ्या आईच्या शेजारी बसलो होतो. मात्र अवघ्या काही मिनिटांतच अचानक एक मोठा आवाज झाला, आम्हाला जोरात झटका बसला आणि सगळीकडे अंधार पसरला. अचानक काय झालं कळलंच नाही, माझीही शुद्ध हरपली. बऱ्याच वेळानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला भयंकर वेदना होत होत्या आणि काही मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली अडकलो होतो” असे देबाशिषने सांगितले.

दरम्यान दहावीत शिकणारा त्याचा मोठा भाऊ सुभाषीष, अंधारात सतत त्याचा शोध घेत होता. बऱ्याच तासांच्या अथक प्रयत्नांतर गावकऱ्याच्या मदतीने सुभाषीने देबाशिषला शोधले आणि त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या अपघातात त्याचे कपाळ व चेहऱ्याला लागले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरी आहेत. खरंच, त्याचा काळ आला होता, पण वेळ… ती आली नव्हती. दैव बलवत्तर होतं म्हणूनच तो वाचला.