
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आज पहाटे पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूर असे या एअर स्ट्राईकला नाव देण्यात आले होते. यावेळी रात्री उशिरा भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. आता या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल भाष्य केले.
भारतीय लष्कर, हवाई दल यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला २००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेला हल्ला, २००८ मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याशी संबंधित काही व्हिडीओ दाखवले. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला हा मुंबईतील २६ नोव्हेंबर नंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यामागील उद्देश काय होते, याबद्दलची माहिती दिली.
२२ एप्रिल २०२५ रोजी लष्कर तोयबाशी संबंधित पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक मारला गेला. मुंबईतील २६ नोव्हेंबर नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता. ही गंभीर घटना होती. पहलगाममधील घटना क्रूर होता. येथील लोकांना जवळून मारलं. कुटुंबाच्या समोर मारलं. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना जाणून बुजून आघात पोहोचवला. तसेच हा संदेश सांगा म्हणून अतिरेकी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील सामान्य स्थिती बाधित करण्याचा हा प्रयत्न होता. या हल्ल्याचा उद्देश प्रभावित करायचं होतं. सव्वा दोन करोड पर्यटक काश्मिरात आले होते. विकास आणि प्रगती होऊ नये हा हल्ल्याचा उद्देश होता. दहशतीचं केंद्र व्हावं हा हेतू होता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.
त्यासोबतच त्यांनी हा हल्ला नेमका कसा घडला याची माहिती दिली. एका समूहाने टीआरएफ म्हणून जबाबदारी घेतली आहे. ही संघटना तोयबाशी संबंधित आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात अर्धवार्षिक रिपोर्ट दिला होता. त्यात टीआरएफची माहिती दिली होती. पाकिस्तानच्या अतिरेक्यांसाठी कव्हर ग्रुप म्हणून टीआरएफ काम करत होता. टीआरएफ सारख्या छोट्या दहशतवादी संघटनांमार्फत तोयबा काम करत होते, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले