Prashant Kishor : ‘या’ दोन राज्यात भाजपा सर्वांना धक्का देणार, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
Prashant Kishor : प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे. भाजपा दोन मोठ्या राज्यात सर्वांनाच चकीत करेल, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीटीआयला मुलाखत दिलीय. भाजपाने या निवडणुकीत 370 जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलय, ते कितपत शक्य आहे, या बद्दल सुद्धा प्रशांत किशोर बोलले.
राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्या टिप्पणीकडे राजकीय जाणकारांच लक्ष असतं. प्रशांत किशोर यांना जनमनाचा चांगला अंदाज आहे. ते निवडणूक रणनितीकार म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या राज्यात विविध राजकीय नेत्यांच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता पॉलिटिकल स्ट्रेटजिस्ट प्रशांत किशोर यांनी भाजपाबद्दल मोठा दावा केला आहे. केंद्रातील सत्ताधारी पार्टी भाजपा दक्षिण आणि पूर्व भारतातील आपल्या जागा आणि मतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करेल. कर्नाटक वगळता दक्षिणेत आणि ईशान्य भारतात भाजपा तशी कमकुवत आहे. प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीटीआयला मुलाखत दिलीय. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं, तरी पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही अजेय नाहीत. विरोधी पक्षाकडे भाजपाचा रथ रोखण्याची संधी होती, याकडे त्यांनी इशारा केला. पण आळस आणि चुकीच्या रणनितीमुळे त्यांनी ही संधी गमावली.
प्रशांत किशोर यांनी दावा केला की, “तेलंगणमध्ये भाजपा या लोकसभा निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरेल. जी एक मोठी बाब आहे. निश्चित ओदिशामध्ये भाजपा नंबर एकचा पक्ष ठरेल” पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपा नंबर एकचा पक्ष ठरु शकतो, असं ते म्हणाले. तामिळनाडूमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी दोन आकडी होऊ शकते. तेलंगण, ओदिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरलमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत. भाजपा 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये 50 जागा सुद्धा जिंकू शकली नव्हती.
भाजपा 370 च विजयी लक्ष्य गाठू शकेल का?
या राज्यांमध्ये भाजपाने 2014 मध्ये 29 आणि 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या. देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. भाजपाकडून 370 जागांवर विजय मिळवण्याचा दावा करण्यात येतोय. पण ते शक्य नाहीय असं सुद्धा प्रशांत किशोर म्हणाले. आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना पुन्हा सत्ता मिळण कठीण दिसतय असं प्रशांत किशोर म्हणाले. पीकेने 2019 मध्ये जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी काम केलं होतं. रेड्डी यांच्या वायएसआरसी पार्टीने तेलगु देसम पार्टीला (टीडीपी) पराभूत केलं होतं. टीडीपी भाजपाचा सहयोगी पक्ष आहे.