Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
Photographer Alok Gupta Murder Case : फोटोग्राफर आलोक गुप्ता अचानक गायब झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. CCTV, रीवामध्ये सापडलेला मृतदेह आणि मोबाईलच्या डिजिटल अॅक्टिव्हिटीने तपासाला वेगळी दिशा दिली.

Alok Gupta Murder : एक तरुण फोटोग्राफर अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 27 वर्षीय फोटोग्राफर आलोक गुप्ता याची हत्या त्याच्याच मित्रांनी केल्याचे उघड झाले असून, ही संपूर्ण घटना पैशांचा वाद आणि एका मोबाईलच्या अवतीभोवती फिरणारी आहे.
सीसीटीव्ही आणि अज्ञाताच्या मृतदेहातून उलगडा
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तीन जण एक मोठी निळ्या रंगाची पिशवी घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी सर्व बाजूंनी धागेदोरे जुळवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी मध्य प्रदेशातील रीवा येथे एक अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रकरणाचा उलगडा झाला.
अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभन तिवारी याने त्याचे मित्र शुभम यादव आणि अंकुश यादव यांच्या मदतीने आपला मित्र आलोक याची हत्या केली. या तिघांनी आलोकच्या मृतदेहाला निळ्या रंगाच्या पिशवीत भरून कारमध्ये टाकले आणि प्रयागराजपासून शेकडो किलोमीटर दूर मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावली. पण खरी कहाणी त्यानंतर सुरु झाली.
हत्येनंतर 20 दिवस चालवला मोबाईल
आलोक हा एक व्यावसायिक फोटोग्राफर होता आणि लग्न व इतर समारंभांचे फोटोशूट करून तो आपला उदरनिर्वाह करत असे. हत्येच्या वेळी आलोकची गर्लफ्रेंड त्याला मेसेज करत होती. मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपींना आलोकचा मोबाईल सापडला. आलोक जिवंत आहे हे भासवण्यासाठी आणि हत्येचे बिंग फुटू नये यासाठी आरोपींनी त्याचा फोन वापरण्यास सुरुवात केली. जणू काही आलोकचे जीवन सामान्यपणे सुरू आहे, असे भासवत ते तब्बल २० दिवस आलोकच्या मोबाईलवरून गर्लफ्रेंड आणि अनेकांशी चॅटिंग करत होते.
अशी झाली आरोपींना अटक
आरोपींनी हा सर्व प्रकार 20 दिवस सुरू ठेवला. मात्र, आलोकच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार अगोदरच दिली होती. त्यामुळे पोलीस तपासात कोणतीही ढिलाई नव्हती. आलोकच्या मोबाईलच्या ‘डिजिटल अॅक्टिव्हिटी’मुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मोठी मदत मिळाली. अखेर पोलिसांनी सुभेदारगंज येथील पुलाखालून सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक अवैध पिस्तूल आणि काडतुसांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हत्येचे नेमके कारण काय?
या हत्येमागील मुख्य कारण पैशांची उधारी असल्याचे समोर आले आहे. आलोकने आरोपींना दिलेले पैसे ते परत करत नव्हते, यावरून त्यांच्यात वाद वाढत गेले. आलोकने सोशल मीडियावर कमेंट करून आरोपींकडे पैशांची मागणी केली होती, ज्यामुळे त्यांच्यातील वैर अधिकच वाढले, असाही दावा केला जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत असून, हत्या नेमकी कशी केली, याचा खुलासा अद्याप होणे बाकी आहे.