मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच; लखीमपूरला जाण्यावर राहुल गांधी ठाम

| Updated on: Oct 06, 2021 | 10:53 AM

उत्तर प्रदेशातील लखीमपूरला जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Rahul Gandhi)

मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच; लखीमपूरला जाण्यावर राहुल गांधी ठाम
Rahul Gandhi
Follow us on

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूरला जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्हाला मारून टाका, गाडून टाका, आम्हाला वाईट वागणूक द्या, त्याने काही फरक पडत नाही. आमची ट्रेनिंग अशीच आहे. मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. आम्ही त्यावर बोलतच राहणार, असं सांगतानाच लखीमपूरला जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी आज लखीमपूरला जाणार आहेत. मात्र, त्यांना उत्तर प्रदेशातील योगी सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या देशात शेतकऱ्यांवर हल्ला होत आहे. त्यांनी जीपखाली चिरडले जात आहे. मंत्र्यांवर कारवाई केली जात नाही. यापूर्वी त्यांची शेती हिसकावून घेतली गेली. तीन कृषी कायदे बनविण्यात आले. त्यामुळेच शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

मोदींना जावसं वाटलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये होते. पण त्यांना लखीमपूरला जावसं वाटलं नाही, अशी टीका करतानाच मी आज लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही तीनजण लखीमपूरला जाणार आहोत. कलम 144 लागू करण्यात आल्याने पाच लोक जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तिघेच जाणार आहोत. आम्ही प्रशासनाला तसे पत्रंही दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशात गुन्हेगार काहीही करू शकतात

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरून जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशात गुन्हेगार काहीही करू शकतात. मर्डर, बलात्कार आणि काहीही. उत्तर प्रदेशात आरोपी बाहेर फिरत असतात आणि पीडित तुरुंगात असतात किंवा त्यांना मारलं जातं, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

दबाव वाढवणं आमचं काम

दबाव वाढवणं हे आमचं काम आहे. हाथरसमध्ये आम्ही दबाव वाढवला त्यामुळे कारवाई झाली. हाथरसमध्ये आम्ही गेलो नसतो तर आरोपी सुटले असते. त्यामुळेच सरकार आम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा दबाव वाढू नये हा सरकारचा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.

पूर्वी लोकशाही होती आता हुकूमशाही

पूर्वी आपल्या देशात लोकशाही होती. आता हुकूमशाही आहे. राजकारणी उत्तर प्रदेशात जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. प्रियंकाला अटक करण्यात आली आहे. मात्र, इथे हा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले. हत्या झालेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाऊ दिलं जात नसेल तर संविधानाला धोका असल्याचं समजून जावं. हा व्हिडीओ पाहून जर कुणाचं मन हेलावत नसेल तर मानवताही धोक्यात आहे असं समजावं, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Priyanka Gandhi Arrested : आधी नजरकैद, आता अटक, प्रियांका गांधींवर UP पोलिसांकडून 36 तासांनी कारवाई

लोकशाहीसंदर्भात जो आवाज उठवतो, त्याची नाकेबंदी केली जातेय, संजय राऊत कडाडले

देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल; राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

(Rahul Gandhi Press Conference after denies permission to visit violence hit Lakhimpur Kheri by Uttar Pradesh government)