आता पुढची 2 वर्षे त्यांना त्रास..; विजय यांच्याविषयी असं का म्हणाले रजनीकांत?

थलपती विजय यांच्याबद्दल काही मतभेद असल्याच्या चर्चांवर अखेर सुपरस्टार रजनीकांत यांनी मौन सोडलं आहे. रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली बाजू मांडली. त्याचप्रमाणे विजय यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आता पुढची 2 वर्षे त्यांना त्रास..; विजय यांच्याविषयी असं का म्हणाले रजनीकांत?
रजनीकांत आणि थलपती विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2026 | 1:50 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी सी. जोसेफ विजय यांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. विजय यांनी कमी वयात एनटीआर यांच्यापेक्षाही अधिक यश मिळवलंय, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. आज (रविवार) रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते त्यांच्याबद्दल पसरत असलेल्या विविध अफवांवर स्पष्टपणे व्यक्त झाले. “मीडिया जेव्हा अचानक मला विजय यांच्याबद्दल विचारू लागली, तेव्हा मी हैराण झालो होतो. मी त्यांच्यासाठी खुश आहे. मला त्यांच्याविषयी ईर्षा किंवा मत्सर का वाटेल? आमच्या वयात 25 वर्षांचं अंतर आहे”, असं ते म्हणाले.

यावेळी थलपती विजय यांच्याबद्दल ते पुढे व्यक्त झाले, “लोकांना विजय यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा आहे. परंतु त्याआधी दोन वर्षांपर्यंत आपण त्यांना त्रास द्यायला नको. त्यांच्या चाहत्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या सन्मानाला कोणताही धक्का पोहोचू नये.” तमिळनाडूच्या द्रविड राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी सिनेमा आणि सोशल मीडियाने खूप मदत केल्याचं मत रजनीकांत यांनी यावेळी मांडलं.

विजय हे तमिळनाडू विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर रजनीकांत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नसल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. इतकंच नव्हे तर निवडणुकीच्या निकालानंतरही विमानतळावर रजनीकांत यांनी विजय यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांवर आता रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर मी या अफवांना उत्तर दिलं नाही, तर त्या खऱ्या मानल्या जातील. निवडणुकीच्या निकालानंतर मी एम. के. स्टॅलिन यांना भेटायला गेलो होतो. हा टीकेचा विषय बनला. आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. एम. के. स्टॅलिन कुलथूरमधून हरले याचं मला दु:ख आहे,” असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं.

“रजनीकांत काही नीच किंवा हलकट माणूस नाही की जो एखाद्या गोष्टीवर विनाकारण टिप्पणी करेल. मी राजकारणात नाही, मग विजयचा हेवा का बाळगावा? माझी त्याच्यावर ईर्षा का असेल? विजय आणि माझ्यात 25 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही”, असं स्पष्ट उत्तर रजनीकांत यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिलं आहे.

Follow Us