पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; सोनिया गांधींना ‘या’ नेत्याने दिला सल्ला

राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. | Shivanand Tiwari

पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; सोनिया गांधींना या नेत्याने दिला सल्ला
| Updated on: Dec 19, 2020 | 7:48 AM

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुत्र मोह सोडावा लागेल, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते शिवानंद तिवारी (Shivanand Tiwari) यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा मोह टाळून काँग्रेस पक्षाला वाचवले होते. मात्र, आज त्याहूनही जास्त महत्त्वाची वेळ असून सोनिया गांधी यांनी पुत्र मोह बाजुला सारून लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे तिवारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (RJD leader Shivanand Tiwari slams Rahul Gandhi leadership)

‘राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्वक्षमता नाही’

दिल्लीत शनिवारी काँग्रेसमधील नाराज नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवानंद तिवारी यांनी फेसबुक पोस्ट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. काँग्रेसच्या बैठकीअंती काय निर्णय घेतला जाणार, हे सर्वश्रुत आहे. मात्र, सध्या काँग्रेसची नौका चालवायला सक्षम नेतृत्त्व नाही.

राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष तोंडघशी पडत असल्याचे शिवानंद तिवारी यांनी म्हटले.

‘सोनिया गांधी काँग्रेसचा गाडा हाकत आहेत’

शिवानंद तिवारी यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. प्रकृती व्यवस्थित नसूनही सोनिया गांधी कशाबशा पक्ष हाकत आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे. सीताराम केसरी यांच्या काळात काँग्रेस पक्ष डबघाईला आला होता. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेऊन पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवले, याची आठवण तिवारी यांनी करुन दिली आहे.

2004 साली काँग्रेस पक्षाला सोनियांच्या नेतृत्त्वाखाली बहुमत मिळाले होते. त्यामुळे सोनिया गांधी या पंतप्रधानपदाच्या नैसर्गिक दावेदार होत्या. मात्र, त्यांनी पंतप्रधानपदाचा मोह टाळणे ही अनन्यसाधारण घटना होती. याच पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी आपल्या देशातील दोन बड्या नेत्यांनी काय नाटकं केली होती, हे सर्वांना माहिती असल्याचेही तिवारी यांनी म्हटले.

‘सोनिया गांधी यांच्यापुढे यक्षप्रश्न’

उमेदीच्या काळात सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावर तेज, आत्मविश्वास आणि अद्भुत शांती होती. लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्याशी माझा परियच करुन दिला होता. मी त्यांना श्रद्धापूर्वक नमन केले होते, असे तिवारी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आज सोनिया गांधी यांच्यापुढे पक्ष की पुत्र यक्षप्रश्न आहे. आता काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचेल की माहीत नाही. मात्र, देश सध्या ज्याप्रकारच्या संकटातून जात आहे त्यामुळे मला अपरिहार्यपणे काही मतं व्यक्त करावी लागत आहेत. आजही प्रादेशिक पक्षांपेक्षा काँग्रेसची ताकद जास्त आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसच भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करावा आणि सक्षम पक्ष म्हणून लोकांना पर्याय द्यावा. लोकशाही आणि देशाची एकता अखंडित ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

काँग्रेस कात टाकणार? सोनिया ‘त्या’ नेत्यांना भेटणार

यूपीए सरकारनं केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे- नरेंद्र मोदी

(RJD leader Shivanand Tiwari slams Rahul Gandhi leadership)