Eknath Shinde : हे तर मोठं दुर्दैव, बाळासाहेबांना धनुष्यबाण…सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच शिंदेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या ठाकरे गटाच्या मागणीला 'मोठे दुर्दैव' म्हणत शिंदे यांनी टीका केली. बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, असे सांगत बाळासाहेबांचे विचारच गोठवले असल्याचा आरोप शिंदेंनी केला. बाळासाहेब व आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde : हे तर मोठं दुर्दैव, बाळासाहेबांना धनुष्यबाण...सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच शिंदेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले...
Eknath Shinde
| Updated on: Sep 01, 2026 | 6:46 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक राजधानी दिल्ली गाठली. कॅबिनेटची बैठक सोडून शिंदे हे दिल्लीत गेल्याने विविध चर्चांना उधाण आलं. उद्यापासून (बुधवार) म्हणजेच 2 सप्टेंबर पासून सुप्रीम कोर्टात पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू होणार असून शिंदे गटातर्फे त्यांचे वकील बाजू मांडणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्ली आल्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्या सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीआधी त्यांनी महत्वाचं विधान केलं. धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी असल्याचं म्हणत एकनाथ शिंदें यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी

मी दिल्लीत येत असतो,आमच्या राज्य प्रमुखांच्या बैठका आहेत. सुप्रीम कोर्टात जी हिअरिंग झाली त्याचा आढावा घ्यायचा आहे. उद्यापासून शिवसेनेच्या बाजून जे आर्ग्युमेंट होईल त्याबाबत देखील चर्चा केली, असं शिंदे यांनी सांगितलं.

मात्र शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. ‘ खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी आणि दु:खद बाब आहे. धनुष्यबाण गोठवण्याची मागणी अतिशय दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवायचे,’ असं शिंदे म्हणाले. ‘बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी ( ठाकरे) 2019 मध्येच गोठवले होते. हिंदुत्वही गोठवलं, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दिलेल मँडेटही त्यांनी गोठवलं. बाळासाहेबांची घटनाही गोठवली, ती घटना बदलण्याचं कामही त्यांनी केलं.आणि आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ते करत आहेत. म्हणजे बाळासाहेबांचे जे काही विचार, त्यांची भूमिका, त्याचं धोरण, राष्ट्रीयत्वाचे विचार पुसण्याचं काम दुर्दैवाने काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत’ असं म्हणत शिंदे यांनी टोमणा मारला.  ‘ पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणारे आहोत.. लोकांनी देखील आम्हाला स्वीकारलं आहे, जनतेनेही आशीर्वाद दिले आहेत,’ असंही ते म्हणाले.

काही लोक सर्वोच्च न्यायालयालाही सूचना देतात

शिवसेनेच्या चिन्हासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक भाष्य करणार नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं. “लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते आणि त्यावरच निर्णय होत असतो. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखणारे लोक आहोत, आदर राखणारे लोक आहोत. पण काही लोकं तर न्यायालयालाही मार्गदर्शन करतात.  निवडणूक आयोगाबाबतही वाटेल ते बोलतात, बेछूट आरोप करतात. तशी भूमिका आमची नाही. यावर मी जास्त चर्चा करू इच्छित नाही. न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. मात्र जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे, हे महाराष्ट्राला आणि देशालाही माहीत आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us