Shraddha Murder Case: आफताबचे कुटुंब झाले भूमिगत, दिल्ली आणि मुंबई पोलीस घेत आहेत शोध

| Updated on: Nov 20, 2022 | 7:53 PM

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याचे कुटुंबीय भूमिगत झाले आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Shraddha Murder Case: आफताबचे कुटुंब झाले भूमिगत, दिल्ली आणि मुंबई पोलीस घेत आहेत शोध
श्रद्धा वालकर हत्याकांड
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली, श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder) प्रकरणी घटनेचा उलगडा करण्यासाठी दिल्ली पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळी पथके वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत आहेत. एक पथक मुंबईतही तपस करीत असल्याचे समजते. पोलिसांनी वसई परिसरातील रिगल इमारतीत चौकशी केली, जिथे श्रद्धा आणि आफताब (Aftab) राहत होते. आफताबला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कुटुंब भूमिगत झाले आहे. महाराष्ट्रातील नयानगर पोलिस आणि माणिकपूर पोलिसांनी कुटुंबाच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.

सगळ्यांचे मोबाईल बंद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी नया नगरमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. पण आता कुटुंब तिथे नाही. आफताबचे आई-वडील आणि भावाचे फोनही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आरोपीच्या मित्रांनाही त्याच्या कुटुंबीयांची माहिती नाही. खरं तर, या खटल्याशी संबंधित एका साक्षीदाराने दावा केला होता की आरोपीच्या कुटुंबाला श्रद्धाच्या रोजच्या मारहाणीची माहिती होती आणि त्यांनी आफताबला संरक्षण दिले होते. त्यामुळे या घटनेशी संबंधित महत्त्वाची माहिती कुटुंबाला असू शकते. भूमिगत झाल्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला आहे.

मुंबईच्या वसईला लागून असलेल्या नालासोपारा येथील रहिवासी पूनम बिर्लान यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, जेव्हा श्रद्धा आणि आफताब एव्हर शाइन परिसरात राहायला आले तेव्हा श्रद्धा त्यांच्याकडे तीनदा मदत मागण्यासाठी आली होती. एकदा पूनमने श्रध्दासोबत तुळींज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एफआयआर नोंदवण्याची तयारी करण्यात आली. श्रध्दाही तयार होती. मात्र आरोपीच्या पालकांनी श्रद्धाची समजूत काढली होती. आफताबला त्याच्या आई-वडिलांनी संरक्षण दिल्याचा आरोप पूनमने केला होता.

हे सुद्धा वाचा

दिल्ली पोलीस करत आहेत तलाव रिकामे

या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती हाती लागली आहे आहे. त्या आधारे पोलीस छतरपूर एन्क्लेव्हमधील तलाव रिकामे करण्यात गुंतले आहेत. वास्तविक, खूनी आफताब याने श्रद्धाचे शीर याच तलावात फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. महापालिकेच्या पथकासह पोलीस श्रद्धाच्या डोक्याचा शोध घेत आहेत. येथून पोलिसांना शीर वर काढल्यास प्रकरणाचा उलगडा होण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे मानले जात आहे. मात्र, हत्त्येत वापरलेले शस्त्र शोधणे हे अजूनही पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.