कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी स्मृती ईराणींचे महत्त्वपूर्ण आवाहन

| Updated on: May 04, 2021 | 10:38 PM

कोरोनामुळे अनाथ झालेली मुले तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील जवळचे कुणी नसेल तर त्या मुलांबाबत पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केले आहे. (Significant appeal of Smriti Irani for children orphaned by Corona)

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी स्मृती ईराणींचे महत्त्वपूर्ण आवाहन
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी स्मृती ईराणींचे महत्त्वपूर्ण आवाहन
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे. या विषाणूच्या संसर्गातून माता-पिता गमवावे लागल्याची वेळ अनेक बालकांवर आली आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या या मुलांच्या पुढील पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची बेकायदेशीररित्या दत्तक प्रक्रियाही सुरू झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी आज देशातील जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केले. कोरोनामुळे अनाथ झालेली मुले तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील जवळचे कुणी नसेल तर त्या मुलांबाबत पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केले आहे. (Significant appeal of Smriti Irani for children orphaned by Corona)

कोरोना महामारीत अनेक कुटुंबे बळी ठरली आहेत. काही कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष व पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्या दाम्पत्यांची मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या जबाबदारीचा, पालनपोषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करीत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आज एकापाठोपाठ एक ट्विट्स केले. या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक विशेष मोहिमच हाती घेतली आहे.

स्मृती ईराणींनी ट्विटमध्ये नेमके काय म्हटले?

जर तुम्हाला कोविड-19 मुळे आई-वडिल गमवावे लागलेल्या मुलांची माहिती कळली, तसेच त्या मुलांची देखभाल करणारे कुणी नसेल, तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या पोलिसांना किंवा बालकल्याण समितीला कळवा. याशिवाय तुम्ही चाईल्ड लाईन 1098 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. ही तुमची कायदेशीर जबाबदारी आहे, असे स्मृती ईराणी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले.

अनाथ मुलाला कुणाच्या ताब्यात देणे बेकायदेशीर

अनाथ मुलाला कुणाच्या ताब्यात देणे बेकायदेशीर आहे. तुम्ही कायदेशीर मार्गाने अनाथ मुलाचा ताबा घेऊ शकता. अशा मुलांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले पाहिजे, जेणेकरून ती समिती अनाथ मुलांच्या हिताचा विचार करून पुढील आवश्यक ती कार्यवाही सुरू करेल. जर कोणीही आपल्याकडून थेट ताबा घेण्यासाठी अनाथ मुलांबाबत चौकशी करीत असेल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांच्या जाळ्यात अडकू नका, त्यांना रोखा. आपण सर्वांनी कायदेशीर मार्गाने कोणत्याही मुलाला दत्तक घेतले पाहिजे. अन्यथा दत्तक घेण्याच्या नावाखाली मुलांची तस्करी केली जाऊ शकते. या तस्करीपासून मुलांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे, असेही स्मृती ईराणी यांनी म्हटले आहे.

बालहक्क आयोगानेही केले आवाहन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या संरक्षणार्थ राष्ट्रीय बालहक्क आयोगानेही पाऊल उचलले आहे. कोरोना संसर्ग होऊन माता-पित्याचा मृत्यू झालेल्या मुलांबाबत स्थानिक पातळीवर बालकल्याण समितीला माहिती द्या, असे निर्देश बालहक्क आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. कोरोना संकट काळात अनाथ मुलांची योग्य काळजी घेणे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचे आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी म्हटले आहे. (Significant appeal of Smriti Irani for children orphaned by Corona)

इतर बातम्या

IRCTC ची प्रवाशांना भेट, प्लाईट तिकीट बूक केल्यानंतर 50 लाखाच्या विम्यासह मिळणार अनेक सुविधा

IPL 2021 ला स्थगिती, खेळाडूंच्या मानधनात कपात, आता कोणाला किती रक्कम मिळणार?