सासूच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेला जावई थेट मगरीच्या तोंडात, 24 तासांनंतर सापडला मृतदेह, मन पिळवटून टाकणारा प्रसंग
सासूच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या जावयाचा देखील मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जावयावर मगरीने हल्ला केल्याची माहिती समोर येत असून, तब्बल 24 तासांनंतर जावयाचा मृतदेह सापडला...

सासूबाईंच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाचा देखील मृत्यू झाला आहे. एकाच वेळी एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 30 वर्षीय दीपक शर्मा सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला. पण त्याचाच मृतदेह 24 तासांनंतर आढळला. सासूच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना एका मगरीने दीपकला सरयू नदीच्या खोल पाण्यात ओढून नेलं. अंत्यसंस्काराची तयारी करत असलेला दीपक जेव्हा पाण्यात उतरला तेव्हाच मगरीने त्याला खोल पाण्यात ओढून घेतलं. स्थानिक पाणबुड्यांनी दीपक याचा कसून शोध घेतला, पण दीपक सापडलाच नाही. अखेरीस, लखनऊ येथून एसडीआरएफच्या पथकाला बोलवावं लागलं. या मन पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे कुटुंब शोकसागरात बुडालं आहे.
सरयू नदीमध्ये उतरताच मगरीचा हल्ला
सांगायचं झालं तर, गोंडा जिल्ह्यातील उमरीबेगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाउली मोहम्मदपूर उदयभान पाहीजवळ सरयू नदीत मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दीपकचा मृतदेह सापडला आहे. ग्रेटर नोएडाचा रहिवासी असलेला दीपक, सासूच्या अंत्यविधीसाठी उमरीला आला होता. प्रत्यक्षदर्शी राजेश शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, दीपक याला नदी न उतरण्याचा सल्ला दिलेला. पण तरी देखील त्याने सरयू नदीत स्नानासाठी गेला… त्याने पाण्यात एक डुबकी मारताच मगरीने त्याच्यावर हल्ला करुन त्याला पाण्यात ओढलं.
दीपक याला शोधण्यासाठी गावकऱ्यांनी आणि नावाड्यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, लखनऊ येथून आलेल्या एसडीआरएफच्या पथकानं आज सकाळी बचावकार्य सुरू केलं. मृताचे सासरे बाबूलाल शर्मा यांनी सांगितले की, घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘ऐली’जवळ गावकऱ्यांना मृतदेह आढळला आणि एसडीआरएफने तो बाहेर काढला. जिल्हा आपत्ती अधिकारी राजेश श्रीवास्तव यांनी मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना आपत्कालीन मदत पोहोचवण्यात येत आहे.
दीपक याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याचं लग्न उमरी येथील रहिवासी बाबूलाल शर्मा यांच्या नातीशी झालं होतं. सासूच्या निधनानंतर घाटावर आपल्या कुटुंबाला अंत्यविधीच्या तयारीत मदत करत असताना धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, जावई असल्यामुळे लोकांनी त्याला चिता तयार करण्यास मनाई केली होती. लोकांच्या मते, मगर लहान असल्यामुळे ती दीपक याचं संपूर्ण शरीर खाऊ शकली नाही, परंतु दीपक याच्या डोक्यावर दातांच्या खुणा आणि उजव्या हातावर जखमा दिसल्या.