अजमेर- भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma)यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या वादावर देश-विदेशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या सगळ्या वादात अजमेरमध्ये (Ajmer Dargah)असलेला सूफी संत ख्वाजा मोईनीदुद्दीन हसन चिस्ती यांचा दर्गाही अनेक कारणांमुळे गेल्या काही दिवसांत चर्चेत आहे. या दर्ग्याशी संबंधित असलेले खादिम आणि अंजुमन कमिटीचे सचिव सरवर चिश्ती यांचा नुपुर शर्मा यांच्यावर टिप्पणी करणारा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सरवर चिश्ती यांचा मुलगा आदिल चिश्ती यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात आदिल चिश्ती हिंदू धर्माच्या देवी-देवतांबाबत टिप्पणी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाल्यानंतर यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेने सरवर चिश्ती आणि त्यांचे पुत्र आदिल चिश्ती (Aadil Chishti)यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दर्ग्याशी संबंधित खादिमचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही चौथी वेळ आहे. २३ जून रोजी आदिल चिश्ती यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय़रल केल्याची माहिती आहे. आता या व्हिडीओ प्रकरणानंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. यापूर्वी आदिल यांचे वडील सरवर चिश्ती यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यात अन्यायाविरोधात मुस्लीम मोठे आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
अजमेर शरीफ हिंदू विरोधी और राष्ट्र विरोधी गतिविधियों का अड्डा बन गई है : @drskj01 pic.twitter.com/ISqlBHzibt
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) July 14, 2022
नुपूर शर्मा यांना प्रश्न विचारण्याच्या संदर्भात आदिल यांनी व्हिडीओत ३३३ कोटी देवतांबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. एक इश्वर समजू शकतो, मात्र ३३३ कोटी देव कसे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एखाद्या माणसाने आयुष्यातील १००० वर्ष जरी खर्ची घातले तरी ३३३ कोटी देवतांना तो राजी करु शकणार नाही, असे आदिल यांनी म्हटले आहे. विष्णूंच्या दशावताराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.एकाच इश्वराचे १० अवतार कसे असू शकतात, अशी विचारणा त्यांनी केलीय. भगवान गणेश आणि हनुमान यांना कसे जस्टिफाय करता येईल, असेही आदिल यांच्याकडून विचारण्यात आले आहे. आदिल चिश्ती आपल्या यू ट्यूब चॅनेलवर वादग्रस्त व्हिडीओ टाकतात आणि नंतर ते व्हायरल करतात. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदिल चिश्ती यांनी माफी मागितली आहे. हा व्हिडीओ एडिट करुन पसरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या, असेही ते म्हणालेत.
या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेने संताप व्यक्त केला आहे. सरवर चिश्ती आणि त्यांचा मुलगा आदिल चिश्ती यांच्याविरोधात राजस्थानच्या गेहलोत सरकारने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या विषारी वक्तव्यांमुळेच देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले असून, उदयपुरात कन्हैय्याचा मृत्यू झाला आहे, असे मत विहिपचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. या व्हिडीओतून हिंदू देवी-देवतांची चेष्टा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तुम्ही दुसऱ्या धर्मांच्या देवांबाबत काहीही बोलाल तर चालते, मात्र मोहम्मद पैंगबरांबाबत एक वक्तव्यही तुम्ही सहन करत नाही. ही कोणती सभ्यता आहे, असा सवालही जैन यांनी उपस्थित केला आहे. या दोन्ही पिता-पुत्रांना तत्काळी तुरुंगात टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे.