Lathicharge: पाटण्यात बेरोजगार शिक्षक उमेदवारांच्या मोर्चावर पोलिसांचा अमानुष लाठीमार, पडलेल्या उमेदवाराच्या हातात तिरंगा असतानाही अतिरिक्त जिल्हाधिकारी थांबेना

| Updated on: Aug 22, 2022 | 5:20 PM

सीटीईटी आणि बीटीईटी उत्तीर्ण झालेल्या सुमारे पाच हजार पात्र उमेदवारांनी डाक बंगला चौकात हे आंदोलन केले होते. हे उमेदवार आंदोलन करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली. सातव्या टप्प्यातील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी या आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. हे आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि पाण्याचे टॅंकर्स तैनात करण्यात आले होते.

Lathicharge: पाटण्यात बेरोजगार शिक्षक उमेदवारांच्या मोर्चावर पोलिसांचा अमानुष लाठीमार, पडलेल्या उमेदवाराच्या हातात तिरंगा असतानाही अतिरिक्त जिल्हाधिकारी थांबेना
बेराजगारांवर लाठीमार
Image Credit source: social media
Follow us on

पाटणा – बेरोजगार शिक्षक उमेदवारांनी काढलेल्या मोर्चावर पटन्यात पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. तिरंगा घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या एका उमेदवाराला अतिरिक्त जिल्हाधिकारी के के सिंह यांनी जबर मारहाण केली. हा उमेदवार जमिनीवर पडलेला असताना, आणि त्याच्या हातात तिरंगा असतानाही अतिरिक्त जिल्हाधिकारी थांबत नव्हते. त्याला लाठीने केलेल्या जबर मारहाणीत रक्तस्राव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्याच्या हातातील तिरंगा हिसकावून घेतला. ही केलेली मारहाण हाच नितीश कुमार यांच्या सरकारचा खरा चेहरा असल्याची टीका आता विरोधकांकडून करण्यात येते आहे.

नियुक्त्या व्हाव्यात यासाठी सुरु होते आंदोलन

सीटीईटी आणि बीटीईटी उत्तीर्ण झालेल्या सुमारे पाच हजार पात्र उमेदवारांनी डाक बंगला चौकात हे आंदोलन केले होते. हे उमेदवार आंदोलन करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली. सातव्या टप्प्यातील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी या आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. हे आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि पाण्याचे टॅंकर्स तैनात करण्यात आले होते. सरकारने या नियुक्त्यांच्या प्रकरणात प्राथमिक जाहीरात जारी करावी अशी या उमेदवारांची मागणी होती. यावेळी आंदोलनकर्ते शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी हा लाठीमार करण्यात आला. आता हे प्रकरण चिघळल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी घेतली माहिती

हा सगळा प्रकार घडल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पाटणाच्या जिल्हाधइकाऱ्यांना फोन केला. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती तेजस्वी यादव यांच्या कार्यालयाने ट्विट करत दिली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लाठीमार करण्याची वेळ का आली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱअयांवर कारवाईची मागणीही करण्यात येते आहे.

नव्या शिक्षणमंत्र्यांकडून आशा होती- आंदोलक

सातव्या टप्प्यातील नियुक्त्यांबाबत जाहिरात काढावी अशी या पात्र उमेदवारांची मागणी होती. यासाठी पाच हजार उमेदवारांनी डाक बंगला चौकात ४ तास रास्ता रोको केला होता. राज्यात नवे शिक्षणमंत्री आल्यामुळे आता ही प्रक्रिया सुरळीत होईल, अशी आशा या आंदोलनकर्त्यांना होती. मात्र हे शिक्षणमंत्रीही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे त्यांचे म्हणमे आहे. प्रत्यक्षात या आंदोलनकर्त्यांवरच लाठीमाराची घटना घडली आहे. या लाठीमारात 28 जण जखमी झाले असून पाच ते सहा जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तीन वर्षांपासून नियुक्त्यांच्या प्रतिक्षेत

बिहारमध्ये शिक्षक भरती परीक्षा 8 वर्षांनंतर झाली होती. याची अधिसूचना 2019 साली जारी करण्यात आली. जानेवारी 2020 मध्ये ऑफलाईन परीक्षा झाली होती. काही परीक्षा केंद्रांवर गोँधळ झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर 2020 साली परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी कोरोना असल्याने ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून या नियुक्त्या झाल्या नसल्याचे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत शिक्षणमंत्री मौन बाळगून आहेत. आता नवे सरकार आल्यानंतर आंदोलन पुन्हा सुरु करण्यात आल्याचे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असाच सुरु राहील, असे त्यांनी सांगितले.