दोन भावंडांनी एकाच महिलेशी केलं लग्न; कारण वाचून व्हाल थक्क!

दोन भावंडांनी एकाच महिलेशी लग्न केलं असून यामागील कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या परंपरेविषयी मला माहिती असून मी स्वत:हून अशा लग्नाचा निर्णय घेतल्याची कबुली वधूने दिली. तर आम्हाला या परंपरेचा अभिमान आहे, असं वर म्हणाला.

दोन भावंडांनी एकाच महिलेशी केलं लग्न; कारण वाचून व्हाल थक्क!
सुनिता चौहान, प्रदीप आणि कपिल नेगी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 20, 2025 | 11:02 AM

हिमाचल प्रदेशातील शिलाई गावात एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. हट्टी जमातीतील दोन भावंडांनी एकाच महिलेशी लग्न केलं. हे लग्न बहुपतीत्वच्या परंपरेनुसार झालं. हट्टी जमातीत ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासून आहे. प्रदीप आणि कपिल नेगी या भावंडांनी सुनिता चौहानशी लग्न केलं. आम्ही कोणत्याही दबावाशिवाय हा निर्णय घेतल्याचं या तिघांनी स्पष्ट केलं. सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स-गिरी भागात 12 जुलै रोजी या लग्नसोहळ्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर तीन दिवस विविध विधी आणि कार्यक्रम पार पडले. या लग्न समारंभाचे काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दोघा भावंडांचं एकाच महिलेशी लग्न

सुनीता चौहान ही कुन्हट गावची रहिवासी आहे. मला बहुपतीत्व परंपरेबद्दल माहिती असून मी स्वत:हून लग्नाचा निर्णय घेतला, असं तिने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे या नात्याचा आदर करत असल्याचं तिने सांगितलं. तर प्रदीप हा शिलाई गावात राहतो आणि एका सरकारी विभागात काम करतो. त्याचा धाकटा भाऊ कपिल हा परदेशात नोकरी करतो. “आम्ही ही परंपरा उघडपणे पाळली आहे, कारण आम्हाला त्याचा अभिमान आहे. हा आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे”, असं प्रदीप म्हणाला. तर दुसरीकडे नोकरीसाठी परदेशात असलो तरी या लग्नाद्वारे पत्नीला आधार, स्थिरता आणि प्रेम देण्याचं वचन कपिलने दिलं. “माझा पारदर्शकतेवर विश्वास आहे. आम्ही तिघंही एकत्र आनंदी जीवन जगू”, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

हट्टी जमातीमधील प्रथा

हट्टी जमात ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर स्थायिक आहे. तीन वर्षांपूर्वी या जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला होता. या जमातीमध्ये शतकानुशतके बहुपतित्व प्रथा प्रचलित आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांमधील वाढलेलं शिक्षणाचं प्रमाण आणि परिसरातील आर्थिक विकासामुळे अशा लग्नांची प्रकरणं कमी झाली होती. “असे विवाह शांतपणे केले जातात आणि समाजही त्यांचा स्वीकार करतो. परंतु आता असे प्रकार खूप दुर्मिळ आहेत. त्यामुळे हे लग्न खास आहे. कारण त्यांनी सार्वजनिकरित्या असं लग्न केलंय,” अशी प्रतिक्रिया गावातील ज्येष्ठ मंडळींनी दिली.

अशा लग्नांमागचं कारण काय?

हिमाचल प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री वाय. एस. परमार यांनी बहुपतित्व परंपरेवर संशोधन केलं होतं. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून हिमालयीन बहुपत्नीत्वाच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर पीएचडी केली होती. त्यांच्या संशोधनातून या प्रथेबद्दल अनेक नवीन गोष्टी उघड झाल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, या परंपरेमागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची जमीन विभागली जाऊ नये. त्यांच्या मते, वडिलोपार्जित मालमत्तेत आदिवासी महिलांचा वाटा हा अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जमीन वाचवण्यासाठी अनेक भाऊ फक्त एकाच महिलेशी लग्न करतात. यामुळे कुटुंबातच जमीन राहते आणि ती विभागली जात नाही.