Raipur Helicopter Crashed : रायपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलटचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: May 13, 2022 | 1:46 AM

अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन पायलट गंभीर जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरु करण्याआधी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन ए पी श्रीवास्तव अशी मृत पायलटची नावे आहेत.

Raipur Helicopter Crashed : रायपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलटचा दुर्दैवी मृत्यू
रायपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले
Image Credit source: TV9
Follow us on

रायपूर : छत्तीसगड सरकारचे हेलिकॉप्टर (Helicopter) गुरुवारी रात्री रायपूर विमानतळावर (Raipur Airport) कोसळले. या अपघातात दोन पायलट (Pilots) ठार झाल्याचे वृत्त आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे. माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर रात्री 9.10 वाजता उड्डाणाच्या सरावात हा अपघात घडला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) प्रशांत अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. लॅंडिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळून दुर्घटना घडली.

उपचार सुरु करण्याआधी दोन्ही पायलटची प्राणज्योत मालवली

अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन पायलट गंभीर जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरु करण्याआधी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन ए पी श्रीवास्तव अशी मृत पायलटची नावे आहेत. अपघाताचे नेमके कारण अजून कळू शकलेले नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरवर ह्या अपघाताची बातमी शेअर केली आणि दोघा पायलटच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री बघेल यांनी ट्विटरवर लिहिले की, कॅप्टन पांडा आणि कॅप्टन श्रीवास्तव या दोन्ही पायलटचा अपघातात मृत्यू झाला आहे. याचवेळी त्यांनी मृत पायलटच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली.

डीजीसीए आणि छत्तीसगड सरकारकडून चौकशी सुरु

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला आहे. लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर वेगाने जमिनीवर आदळले. त्यात हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस उपस्थित आहेत. रात्री उशिरापर्यंत हेलिकॉप्टरचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे रायपूर विमानतळावरील नियमित उड्डाणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. सर्व उड्डाणे सुरळीत सुरु असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि छत्तीसगड सरकार यांच्या वतीने सविस्तर तांत्रिक तपासणी करण्याचा आदेश दिला आहे

मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कॅप्टनना सर्व स्तरांतून श्रद्धांजली

छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव यांनीदेखील या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले कि, रायपूर येथे हेलिकॉप्टर अपघातातील दोन वैमानिकांच्या मृत्यूच्या दु:खद बातमीने हृदय खूप दुखावले आणि व्यथित झाले. मृतांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच राज्यपाल अनुसुईया उईके, विधानसभेचे अध्यक्ष डॉ. चरणदास महंत यांच्यासह अनेक नेत्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कॅप्टनना श्रद्धांजली वाहिली आहे.