
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना यावर्षी मार्चमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमुळे चार दिवसांसाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते रुग्णालयातून सुखरूप परतले होते. परंतु, सोमवारी त्यांनी आरोग्याच्या कारणांचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
74 वर्षीय जगदीप धनखड यांनी सांगितले की, ते आपल्या आरोग्याला प्राधान्य देत असून वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत आहेत. हा अनपेक्षित घटनाक्रम सोमवारी यापूर्वी झालेल्या एका चर्चेनंतर घडला, ज्यामध्ये पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्री संसदेत एकांतात बसले होते. कदाचित याच मुद्यावर ते सर्व चर्चा करत होते.
पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदपीप धनखड यांच्या राजिनाम्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “श्री जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती यासह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो” या आशयाची पोस्ट त्यांनी केली.
Shri Jagdeep Dhankhar Ji has got many opportunities to serve our country in various capacities, including as the Vice President of India. Wishing him good health.
श्री जगदीप धनखड़ जी को भारत के उपराष्ट्रपति सहित कई भूमिकाओं में देश की सेवा करने का अवसर मिला है। मैं उनके उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2025
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून तीन वर्षांपेक्षा कमी काळ काम केले आहे. सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयाने 23 जुलै रोजी जयपूरच्या अधिकृत दौऱ्याच्या योजनेबाबत एक निवेदन जारी केले होते. जगदीप धनखड़ राज्यसभेतही उपस्थित होते, जिथे त्यांनी जस्टिस यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाची मागणी करणारे 50 हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केलेले पत्र प्राप्त केल्याची घोषणा केली. या पत्रावर विरोधी पक्षाच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि जगदीप धनखड़ यांनी ते स्वीकारले. त्यांनी नंतर सचिव-जनरल यांना या प्रकरणाला पुढे नेण्याचे निर्देश दिले.
वाचा: सोनमला जराही पश्चाताप नाही, कैद्यांसोबत मजामस्ती सुरु; तुरुंगात नेमकं काय सुरु
सूत्रांनुसार, उपराष्ट्रपतींनी कोणतीही पूर्वनियोजित भेट न घेता अचानक राष्ट्रपती भवनात येऊन आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. आता प्रश्न आहे की त्यांनी अचानक राजीनामा का दिला? संसदेत जगदीप धनखड यांच्या काँग्रेसच्या अनेक विरोधी नेत्यांशी अलीकडील जवळीकीबाबत चर्चा सुरू होती. त्यांनी गेल्या आठवड्यात व्हीपी एन्क्लेव्ह येथे मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती आणि रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही बैठक केली होती. न्यायपालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी NJAC सारख्या संस्थेच्या पुनरागमनासाठी जगदीप धनखड यांचे अभियानही सरकारच्या विचारांशी जुळत नव्हते.
जगदीप धनखड कोण आहेत?
1951 मध्ये राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात जन्मलेले धनखड एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी 1979 मध्ये राजस्थान बारमध्ये प्रवेश घेतला. सुप्रीम कोर्ट आणि विविध उच्च न्यायालयांमध्ये राज्याचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी काम केले आणि राजस्थान उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही सेवा केली.
जगदीप धनखड यांचा राजकीय प्रवास
1990 च्या दशकात राजकारणात प्रवेश करताना ते जनता दलासोबत झुंझुनू येथून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून सेवा केली. 2003 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांचा ममता बॅनर्जी सरकारशी अनेकदा वाद झाला. आता त्यांच्या राजिनाम्याने सर्वांना प्रश्न पडला आहे.