Suvendu Adhikari : ..तर माझ्याइतकं वाईट कोणी नसेल, मुस्लिम बहुल वस्तीत जे घडलं त्यानंतर मुख्यमंत्री अधिकारी यांची डायरेक्ट वॉर्निंग
Suvendu Adhikari : लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शनाला परवानगी असेल पण धार्मिक घोषणांच्या आडून हिंसा सहन केली जाणार नाही. कोणीही विरोध प्रदर्शन करु शकतो. हा लोकशाही देश आहे. राजकीय संघटना आणि धार्मिक समूह पोलिसांना सूचित केल्यानंतरच आपल्या मागण्या मांडू शकतात.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी राज्याची सत्ता संभाळताच थेट Action मोडमध्ये आले आहेत. नुकतीच बंगालमध्ये दगडफेकीची घटना घडली. त्यावर सुवेंदू अधिकारी यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे. जे पोलिसांवर दगडफेक करतील, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतील, त्यांना अजिबात सहन केलं जाणार नाही असं ते म्हणाले. झिरो टॉलरन्स धोरणाची त्यांनी घोषणा केली. पुन्हा अशा घटना घडल्या तर गृहमंत्री म्हणून माझ्याइतकं कोणी वाईट नसेल असा थेट इशाराच सुवेंदू अधिकारी यांनी देऊन टाकला. जम्मू-काश्मीरचा उल्लेख करत ते म्हणाले की, तिथे आता दगडफेकीच्या घटना बंद झाल्या आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये काश्मीरची ही दगडफेकीची संस्कृती चालणार नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलं.
कोलकत्ताच्या पार्क सर्कस-तिलजाला क्षेत्रात अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली. त्याविरोधात हिंसक विरोध प्रदर्शन झालं. दगडफेक झाली. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी हा इशारा दिला आहे. रविवारी मुस्लिम बहुल पार्क सर्कस भागात हिंसाचार झाला. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयला भेट दिली. जखमी पोलिसांची विचारपूस केली. पत्रकारांशी बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत कठोर भूमिका घेतली. मागच्या सरकारसोबत आपल्या सरकारच्या कामकाजाची तुलना करत त्यांनी फरक दाखवून दिला. 6 पोलीस आणि 2 CRPF जवान जखमी झाले. आतापर्यंत एकूण 40 लोकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
हे अजिबात सहन करणार नाही
अशा प्रकारची अशांतता, गुन्हेगारीकरण,राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी घडामोडी अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाही असं सीएम सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं. जमाव चिथावणी देत असूनही संयम दाखवल्याबद्दल त्यांनी पोलीस आणि केंद्रीय पथकांचं कौतुक केलं. “मी जखमी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना भेटायला आलो आहे. काल आमच्या सगळ्या फोर्सने कायदा-सुव्यवस्था राखली. एक मोठी अप्रिय घटना टाळून लोकांची रक्षा केली. मी त्यांना हे सांगायला आलोय की, सरकार मजबुतीने तुमच्यासोबत उभं आहे” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.
ते दिवस आता गेले
त्यांनी आधीच्या तृणमुल काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. “पोलीस खात्याशी संबंधित मंत्री एसी रुममध्ये बसून असायचे आणि पोलीस जखमी व्हायचे ते दिवस आता गेले. पोलीस खात्यावर आधी काही बंधनं होती. ते जुने नियम आता लागू होतात असा विचार करु नका. कोणाला असं वाटतं असेल की, पोलीस खात्याचे हात-पाय बांधलेले आहेत, तर तो त्यांचा गैरसमज आहे” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.