मोठा ट्विस्ट, पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वात मोठा हादरा, दोन एक्झिट पोलने उडवली झोप, नवे आकडे काय?
Bengal Exit Polls : पश्चिम बंगालमधील एक्झिट पोलमुळे ममता बॅनर्जींना थोडी चिंता तर वाटली असेल, पण दोन पोलमुळे काहीसा दिलासाही मिळाला आहे. ममता यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, की बंगालमध्ये कमळ फुलणार? असाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात असून लवकरच त्याचं उत्तर मिळणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काल दुसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडलं असून 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक्झिट पोल जाहीर झाले. केवळ दोन पोलनुसार ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा निवडून येईल असे संकेत मिळत आहेत. मात्र इतर पोलमधून राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. ‘पीपल्स पल्स’ आणि ‘जनमत पोल’नुसार, टीएमसी भाजपचा पराभव करेल, तर इतर सर्व पोलमध्ये टीएमसी पिछाडीवर आहे. मात्र, 2021 च्या निवडणुकांबद्दल पुन्हा एकदा विचार केला तर तेव्हा भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होते, पण टीएमसीने त्यांना पछाडत विजय मिळवला होता.
TMCला मिळणार का 200 पेक्षा जास्त जागा ?
कालच्या मतदानानंतर जे एग्झिट पोल आले, त्यामध्ये जनमत पोल्स आणि पीपल्स पल्स वगळता, इतर कोणत्याही प्रमुख एक्झिट पोलमध्ये टीएमसी 200 जागांचा टप्पा ओलांडेल असं चित्र दिसत नाहीये. पोलनुसार टीएमसीला 195 ते 205 जागा आणि 49.50% मतांचा वाटा मिळेल. तर दुसरीकडे, भाजपला 80-90 जागा आणि 40.50% मतांचा वाटा देण्यात आला आहे. याचाच अर्थ असा या निवडणुकीत टीएमसीचा दणदणीत विजय अपेक्षित आहे.
तर पीपल्स पल्सच्या रिपोर्टनुसार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या एग्झिट पोलनुसार, टीएमसी 177 ते 187 जागा मिळवून 200 च्या जादुई आकड्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. भाजपला 95 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या दोन एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून असं सूचित होतं की, ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवडून येतील आणि भाजपला पुन्हा धोबीपछाड देतील. त्यामुळे पक्षाला आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागू शकतं.
पण जर आपण इतर एक्झिट पोल पाहिले, तर चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय, तीच खरी खरी गंमत आहे. बाजारातील जवळपास सर्व प्रमुख आणि प्रसिद्ध सर्वेक्षणांनी, भाजपला आघाडी मिळेल, असं दर्शवलं आहे.
या दोन सर्व्हेज शिवाय इतर ठिकाणी TMCची स्थिती काय ?
मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 146 ते 161 जागा मिळतील, तर टीएमसीला 125 ते 140 जागा मिळतील असा अंदाज आहे. या जागा बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जादुई आकड्याच्या जवळपास किंवा त्याहून अधिक आहेत.
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या सर्वेक्षणानुसार बंगालमध्ये मोठा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार भाजप हा 150 ते 160 जागा जिंकून बहुमत मिळेल, तर टीएमसीला 130 ते 140 जागा मिळतील.
पोल डायरीने भाजपच्या आणखी मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवला असून, त्यांना 142 ते 171 जागा मिळतील असे म्हटले आहे, तर या सर्वेक्षणात टीएमसीच्या जागा 99 ते 127 पर्यंत कमी झाल्या आहेत.
दुसरी प्रमुख एजन्सी, पी-मार्कनेही असाच कल दर्शवला असून, भाजपला 150 ते 175 जागा आणि टीएमसीला 118 ते 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
“हे एक्झिट पोल्स निराधार आहेत. त्यांचा जमिनीवरील वास्तवाशी काहीही संबंध नाही. आम्ही 235 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि भाजपला 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत ” असं विश्वास टीएमसी नेते कुणाल घोष यांनी दर्शवला.
भाजप पिछाडीवर ?
मात्र या एग्झिट पोलमधील एवढा मोठा फरक पाहता, आत्ताच काही सांगणं कठीण आहे. इतर सर्वेक्षणांच्या सरासरीनुसार पाहिल्यास, बंगालच्या निवडणुकीत भाजप मागे नसून पुढे असल्याचे दिसतं. पण हे केवळ अंदाज आहेत, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 2021 सालच्या विधानसभा निवडणुकीत, अनेक एक्झिट पोलनी भाजप सरकार स्थापन करेल किंवा त्यांना अटीतटीच्या लढतीला सामोरे जावे लागेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, जेव्हा निकाल जाहीर झाले, तेव्हा ममता बॅनर्जींच्या टीएमसीने 213 जागा जिंकून प्रचंड विजयासह पुन्हा सत्ता मिळवली.
आता या निवडणुकीचा खरा निर्णय सोमवार, 4 मे रोजी लागार असून सर्वांच लक्ष तिकडेच लागलं आहे.