Railway News : नावात काय आहे ? मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांचा रंजक इतिहास

| Updated on: Apr 11, 2024 | 6:28 PM

नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. परंतू नावातच सर्वकाही असते. ब्रिटीशांनी त्यांच्या फायद्यांसाठी रेल्वे मुंबईत आणली. मुंबईवर राज्य करताना ब्रिटीशकालीन गव्हर्नर आणि अधिकाऱ्यांची नावे रेल्वेस्थानकांना मिळाली. मुंबईतील काही स्थानकांची नावे यापूर्वीच बदलली आहेत. काय आहे या स्थानकांचा इतिहास, नावे बदलल्याने काय होणार फायदा पाहूयात...

Railway News : नावात काय आहे ? मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांचा रंजक इतिहास
मुंबईच्या रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे नष्ट होणार
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरे तर ब्रिटीशांनी आपल्या देशावर राज्य करताना त्यांचा कारभार सुरळीत चालण्याासठी अनेक सुविधा सुरु केल्या होत्या. त्यात मुंबईत 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ( मुंबई-सीएसएमटी ) ते ठाणे अशी आशियातील पहिली रेल्वे गाडी सुरु केली. मुंबईतील जडणघडणीत अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या स्थानकांना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यातील काही नावे उच्चारायला अवघड आहेत. त्यामुळे त्या परिसराच्या नावाने संबंधित स्थानकांना नावे देण्यात यावीत असे पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. त्यानूसार आता मुंबईतील स्थानकांची इंग्रजी नावे जाऊन त्यांना आता मराठीत नावे देण्यात येणार आहेत. या स्थानकांना का अशी नावे का पडली, आता नावे बदलण्याने काय फायदा होणार ? रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते ? याची संपूर्ण माहीती पाहूयात…

मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नऊ ब्रिटीशकालीन नावे बदलून नवीन नावे देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. परंतू रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील व्हीक्टोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले होते. तर पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी स्थानक असे करण्यात आले होते. आता मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाला लालबाग, सॅंडहर्स्ट रोड स्थानकाला डोंगरी, पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स स्थानकाचे नाव मुंबादेवी, चर्नी रोड स्थानकाला गिरगाव, ग्रॅंटरोड स्थानकाला गावदेवी, हार्बर रेल्वेच्या कॉटनग्रीन स्थानकाला काळाचौकी, रे रोड स्थानकाला घोडपदेव, डॉकयार्ड स्थानकाला माझगाव, किंग्ज सर्कल स्थानकाला तीर्थकर पार्श्वनाथ असे नाव देण्याची मागणी केली आहे.

मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावे कशी पडली

मुंबईतील बोरीबंदर येथून ठाणे येथे पहिली प्रवासी ट्रेन 16 एप्रिल 2024 रोजी धावली. परंतू बोरीबंदर या जुन्या स्थानकाचे नाव कोणी म्हणते येथे बोरीची झाडे होती म्हणून नाव पडले. तर कोणी म्हणते येथे गोणी भरपूर असायच्या. गोण्यांना हिंदीत बोरी म्हणतात. तर येथे बोहरी मुस्लीमांची वसती होती. त्यामुळे बोरा बाजार परिसर आहे. त्यामुळे बोरीबंदर असे नाव पडले. त्यानंतर हे स्थानक नष्ट करुन येथे 1878 मध्ये नवीन स्टेशन बांधायचे ठरले. त्यासाठी फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन या रेखाचित्रकारावर जबाबदारी सोपविली. r1888 मध्ये नव्या स्टेशन इमारतीचे उद्धाटन झाले. त्याकाळी व्हीक्टोरीया राणीच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण महोत्सवाचे वर्षे चालू असल्याने या स्थानकाचे नाव व्हीक्टोरीया टर्मिनस ( V.T.) असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर 27 वर्षांपूर्वी या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले. दोन दशकांपूर्वी या स्थानकाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेड साईटचा दर्जा दिला. 2017 मध्ये या स्थानकाचे नाव वाढवून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.

मस्जिद स्थानकाची कहानी

मस्जिद स्टेशनचे नाव आधी मस्जिद बंदर असे होते. कोणी म्हणते या स्थानकाबाहेर सातपाड मशिद असल्याने त्याचे नाव मस्जिद बंदर पडले. मराठी भाषित ज्यू लोक जे अलिबाग येथून आले. मुंबईतील ज्यूंचे पवित्र धर्मस्थळ सिनेगॉग येथे होते. त्याला मराठी लोक मशिदच म्हणायचे म्हणून या स्थानकाचे नाव मस्जिद बंदर पडल्याचेही सांगितले जाते. सॅंडहर्स्ट रोड स्थानक आधी माझगाव आणि डोंगरी भागाला जोडणाऱ्या हॅंकॉंग ब्रिज जवळ स्थित होते. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर होते लॉर्ड सॅंडहर्स्ट यांचे नाव या स्थानकाला मिळाले. त्यांनी मलेरियाच्या साथीत खूप चांगले काम केले. म्हणून चौपाटीते या भागापर्यंत येणाऱ्या रस्त्याला सॅंडहर्स्ट रोड असे नाव दिले. हेच नाव या स्थानकाला मिळाले. या रस्त्याला आता सरदार वल्लभभाई पटेल असे नाव आहे. काही जण ज्यांना सॅंडहर्स्ट नाव उच्चारता येत नाही ते या स्थानकाचे नाव संडास रोड असे उच्चारतात. त्यामुळे या स्थानकाचे नाव डोंगरी झाले तर चांगलेच होईल असे म्हटले जात आहे.

भायखळ्याचे नाव कसे पडले ?

आपण इंग्रजीत भायकला किंवा मराठीत भायखळा म्हणतो त्या भायखळाचा इतिहास मजेशीर आहे. पूर्वीचे भायखळा स्थानक हे आज जेथे मांडकेश्वराचे मंदिर आहे त्यापुढे खडा पारसीचा पुतळा आहे, त्याच्या पुढे एक पुल आहे त्याच्याखाली पूर्वीचे भायखळा स्थानक होते. भायखळा स्थानकाचे नाव कसे पडले त्याच्या अनेक थिअरी आहेत. येथे सोन बहाव्याची खूप झाडं होती. येथे मोठे खळे ( सखल भाग ) होते. त्यामुळे भायाचा खळा म्हणून याचे नाव भायखळा होते असे म्हणतात.

चिंचपोकळी हे जुने गावठाण

चिंचपोकळी हे जुने गावठाण होते. चिंचपोकळीला एक छोटीशी टेकडी होती. चिंचपोकळीला खूप चिंचेची झाडे होती. त्यामुळे झाडाची पोकळी म्हणून याला चिंचपोकळी हे नाव पडले. मुंबईत 125 वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली तेव्हा चिंचपोकळी स्थानकाला एक बॅरिकेट्स लावले होते. येथे संशयित रुग्णाची तपासणी करुन त्याला लगेच शेजारच्या कस्तुरबा रुग्णालयात नेले जायचे.

करीरोड घोड्यांसाठी बांधले

करीरोड म्हणजे अनेक लोकांना ‘करी’ म्हणजे आमटी किंवा रस्सा असे वाटत असेल. परंतू करीची इंग्रजी स्पेलिंग नीट पाहीली तर ती CURREY अशी आहे. म्हणजेच हे एका व्यक्तीचे नाव आहे. रेल्वेचे एक अधिकारी होते. त्यांचे नाव चार्ल्स करी त्यांच्या नावावरुन या स्थानकाचे नाव करीरोड असे पडले आहे. करीरोड स्थानकावर उतरण्यासाठी जिने नाहीत. तर येथे प्रवाशांना उतरण्यासाठी एक ( उतारासारखा रॅम्प आहे. हा रॅम्प खरे तर माणसांसाठी नाही तर जनावरांसाठी आहे. घोड्यांना उतरण्यासाठी हा रॅम्प बांधला होता. रेसकोर्स पूर्वी मदनपुरा येथील परिसरात होता. पुणे आणि लोणावळा येथील स्टड फार्ममध्ये घोडे पाळले जायचे. तेथून घोड्यांना मुंबईत आणल्यावर त्यांना करीरोड येथे गाडीतून उतरविले जायचे. त्या घोड्यांची स्थानकातील चढउतार सोपी व्हावी म्हणून हा रॅम्प बांधला असल्याचे म्हटले जाते.

परळ स्थानकाचे नाव कसे पडले ?

परळ गावठाण हाफकिन इन्सिट्यूटच्या पुढे परळ व्हीलेज होते. असे म्हणतात की येथे परळी वैजनाथाचे मंदिर होते. ते पाडून तेथे ख्रिस्ती लोकांनी प्रार्थनास्थळ बांधले. त्यामुळे परळ स्थानकाचे नाव पडले असे म्हणतात. नंतर ते गव्हर्मेंट हाऊस झाले. हाफकिन इन्सिट्यूट बनायच्या आधी येथे व्हीक्टोरिया राणीचे गव्हर्नर हाऊस होते. व्हीक्टोरीया राणीचे दोन पुत्र जेव्हा मुंबईत आले तेव्हा ते येथे उतरले होते. त्यांच्यासाठी परळ येथे तात्पुरते स्थानक बांधल्याचे म्हटले जाते. तेच आजचे परळ स्थानक म्हटले जाते.

दादर स्थानकाचे नाव कसे आले पुढे ?

दादर स्थानकाचे नाव वाचून सर्वांना एक प्रश्न नेहमीच पडत असतो. मराठीत ‘दादर’ शब्दाचा अर्थ जिना असा होतो. परंतू हा जिना कुठे दिसत नाही. परंतू दादर नावाचे स्वतंत्र बेट नव्हते. तर मुंबईच्या सात बेटांपैकी माहीम आणि परळ अशी दोन स्वतंत्र बेटं होती. ज्यावेळी समुद्राला ओहोटी असायची तेव्हा रेती आणि मातीच्या चिखलातून बेट ओलांडण्यासाठी एक बंधारा होता. त्याला ‘दादर’ म्हणायचे म्हणून या परिसराला दादर म्हटले गेले. त्यावरुन स्थानकाला ‘दादर’ असे नाव पडल्याचे जाणकार सांगतात.

नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी काय असते ?

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण आठ ते दहा स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे करीरोड आणि सॅंडहर्स्ट रोड हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड, किंग्ज सर्कल, कॉटन ग्रीन, रे रोड तसेच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, मरीन लाईन्स, चर्नी रोड आणि ग्रॅंटरोड अशा आठ स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर करावा लागेल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. रेल्वेची स्थानके रेल्वेच्या मालकीची असतात. रेल्वेच्या त्या-त्या झोन मार्फत या रेल्वे स्थानकांचे व्यवस्थापन सांभाळले जाते. स्थानकांची नावे राज्य सरकारशी विचारविनिमय करुन दिली जातात. ऐतिहासिक कारणे, स्थानिकांची भावना याद्वारे स्थानकांची नावे देण्याची मागणी राजकीय, सामाजिक संघटना यांच्याकडून वारंवार होत असते. नाव बदलताना नवे नाव का द्यावे याचा खुलासाही अर्जासोबत जोडावा लागतो. नाव बदलण्याचा अंतिम निर्णय मात्र रेल्वेबोर्ड करीत असते.

रेल्वे बोर्डाचा निर्णय महत्वाचा ठरतो

राज्य सरकार रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयामार्फत केंद्र सरकारला पाठविते. त्याला मंजूरी दिल्यानंतर रेल्वे बोर्ड या बदलणाऱ्या नव्या नावाचे स्थानक देशात अन्यत्र कुठे आहे का याची तपासणी करते. या नावाचे दुसरे स्थानक असल्यास नावात बदल सुचविला जातो. नावासह स्थानिक ठिकाणाचे नाव जोडून बदल सुचविला जातो. तसेच नव्या प्रस्तावित नावानूसार इमारत, फलाटांवरी फलक, तिकीट तसेच आरक्षण यंत्रणेत बदल केला जातो. नव्या स्थानकाच्या नावाचा ‘स्टेशन कोड’ रेल्वे बोर्ड ठरवितो. प्रत्येक स्थानकाचा ‘स्टेशन कोड’ ( सांकेतिक नाव ) वेगळा असतो. स्थानकाच्या नावात बदल केला की ‘स्टेशन कोड’ देखील बदलावा लागतो. हे सांकेतिक नाव तिकीट आरक्षण यंत्रणेत वापरले जात असते.

नाव बदलण्याचा खर्च ?

व्हिक्टोरिया टर्मिनसचा स्टेशन कोड VT होतो. या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस केल्यानंतर स्टेशन कोड CST असा झाला. ज्यावेळी या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे केले तेव्हा स्टेशन कोड CSMT असा करण्यात आला. स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वे बोर्डाकडे येतो. त्यानंतर स्थानकाचे नाव बदलण्याची प्रक्रीया सुरु होते. प्रत्येक स्थानकाच्या स्वरुपानुसार नाव बदलण्याचा खर्च येत असतो. स्थानकाचा उल्लेख मर्यादित असल्यास खर्च कमी येतो तर स्थानकाची व्याप्ती मोठी असेल तर त्यानुसार त्याचा उल्लेख सर्वत्र बदलावा लागतो. मग त्याचा खर्च सर्वात जादा येत असतो.