चीनच्या प्रेमात पडलेल्या मालदीवला अचानक का आली भारताची आठवण, जाणून घ्या कारण
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले असतानाच मालदीवचे परराष्ट्र मंत्री अचानक भारत दौऱ्यावर आले आहेत. एकीकडे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला अचानक भारताची आठवण कशी आली याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यामागचं नेमकं कारण काय जाणून घ्या.
Mladive india relation : मालदीव-भारत तणाव सुरु असतानाच मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर गुरुवारी प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. मूसा जमीर आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची नवी दिल्लीत आज भेट झाली. या भेटीत दोन्ही दिग्गजांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. मुसा जमीर हे अचानक भारत भेटीवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले मोहम्मद मुइज्जू यांनी सतत भारत विरोधी भूमिका घेत दोन्ही देशांमधील संबंध खराब केले होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी ‘इंडिया आउट’ मोहीम चालवली होती. ते चीन समर्थक असल्याने भारतविरोधी भूमिका घेत असल्याचं म्हटलं जात आहे. पण असं असतानाच त्यांच्याच सरकारमधील परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येण्यामागचं कारण काय आहे हे अनेकांना जाणून घ्यायचे असेल.
मालदीवचा भारताशी पंगा
मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांना भारतात माघारी पाठवण्याचा निर्णय़ घेतला होता. त्याआधी त्यांनी संपूर्ण निवडणूक ‘इंडिया आउट’ मोहिमे अंतर्गतच लढवली होती. भारतीय सैनिकांना मालदीव सोडण्यास त्यांनी भाग पाडले. त्यासाठी त्यांनी १० मेपर्यंतची मुदत दिली. त्यानंतर भारतानेही आपले ५१ सैनिक मागे घेतले आहेत. तर राहिलेले सैनिकही माघारी येणार आहेत. मुइज्जू यांच्या या भारतविरोधी भूमिकेमुळे त्यांच्याच अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कारण भारतातील बॉलिवूड स्टार्स आणि सेलिब्रिटींनीही मालदीववर बहिष्कार टाकला. त्यानंतर भारतीय पर्यटकांनी ही मालदीवकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला.
अर्थव्यवस्थेला झळ बसल्यानंतर मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये येऊन त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचं आवाहन केले आहे. आपण भारतीयांचे स्वागत करण्यासाठी उत्सूक असल्याचं ते म्हणाले होते.
भारतीयांचा मालदीववर बहिष्कार
मालदीवसोबतचा वाद वाढल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी मालदीववर बहिष्कार टाकला. अनेक लोकांनी त्यांचे मालदीवचे बुकिंग रद्द केले होते. भारतानेही मालदीवला पाठिंबा देणे बंद केले. त्यामुळे मालदीवची स्थिती बिघडली आहे. आता त्यामुळे त्यांना भारताची आठवण येत आहेय भारताने नेहमीच आपल्या शेजारील देशांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारत नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांना मदत करत आला आहे. पण चीनला खूश करण्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारतासोबत पंगा घेताना दिसत आहेत.
आपल्या पहिल्या भारत भेटीवर मुसा जमीर म्हणाले की, “ही चांगली भेट होती. माझे अतिशय प्रेमाने स्वागत करण्यात आले. माझे समकक्ष एस जयशंकर आणि माझी सकारात्मक चर्चा झाली. मी भारत सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो. 1965 मध्ये जेव्हा मालदीव स्वतंत्र झाला, तेव्हापासून आम्ही आमचे संबंध अधिक मजबूत केले आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “भारत नेहमीच नेबर फर्स्ट धोरणाचे पालन करतो. दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर हितसंबंधांवर आधारित आहेत. भारत मालदीवशी सहकार्य करणाऱ्या महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. आमच्या अनेक प्रकल्पांचा मालदीवच्या लोकांना फायदा झाला आहे. भारताने अनेक प्रसंगी मालदीवला आर्थिक मदतही केली आहे.”