सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?
सोनम यांची तब्येत आता एकदम बरी आहे. आपण हायकोर्टात आपले पती सोनम यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे गीतांजली यांनी म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही मागणी मान्य केली नाही.

सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या २१ व्या दिवशी काल दिल्ली पोलिसांनी त्यांना उचलून नेत सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. आता उद्या २० तारखेला संसदेवर आयोजित केलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो हीने मोठी घोषणा केली आहे. जर नेत्यांनी सोनम वांगचुक यांना आश्वासन दिले की उद्या संसदेच्या मान्सून सत्रात शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा उचलतील तर ते उपोषण सोडतील असे सोनम यांची पत्नी गीतांजली यांनी जाहीर केले आहे.
गीतांजली आंग्मो यांनी म्हटले आहे की जर संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील गैरकारभारावर जबाबदारी निश्चित केली तर आपले पतीन सोनम उपोषण मागे घेतील. मात्र, या नेत्यांनी रुग्णालयात येऊन सोनम यांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त करायला हवे तरच ते उपोषण मागे घेतील असेही गीतांजली यांनी म्हटले आहे.
संसद चलो मार्चच्या आधी समर्थकांना संदेश
संसदेवरील उद्याच्या मोर्चाचे नेतृत्व निश्चित रुपाने करुन मोर्चात उद्या आपण सोनम वांगचुक यांचे प्रतिनिधत्व करु असेही गीतांजली यांनी म्हटले आहे. आम्ही आज एक तातडीची याचिका दाखल केली होती, कारण जर आम्हाला आज निघण्याची परवानगी मिळाली असती, तर आम्ही मेदांताला जाऊन उद्या सकाळपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचू शकलो असतो. पण आम्हाला माहीत होतं की ते तसं करू देणार नाहीत. मी सोनम वांगचुक यांचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे आणि उद्या मोर्चात नक्कीच सहभागी होईन असेही गींताजली यांनी म्हटले आहे.
उद्याच्या मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यी आणि पालकांच्या मी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे, आपण हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने काढूया. दुसरी गोष्ट म्हणजे, जे कोणी यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून सावध राहा.तसेच दक्ष राहा आणि त्यांच्या जाळ्यात अडकू नका.उद्याच्या मोर्चात गोंधळ निर्माण करण्याचे किंवा कार्यक्रमाला विकृत दिशा करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे, सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
