महाविकास आघाडीच्या संसारात ममता बॅनर्जींकडून मिठाचा खडा; काँग्रेस नेते आक्रमक, तर शिवसेना, राष्ट्रवादीची सारवासारव!

| Updated on: Dec 02, 2021 | 9:52 PM

ममता यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. मात्र, त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीच्या संसारात ममता बॅनर्जींकडून मिठाचा खडा; काँग्रेस नेते आक्रमक, तर शिवसेना, राष्ट्रवादीची सारवासारव!
अशोक चव्हाण, शरद पवार, ममता बॅनर्जी
Follow us on

मुंबई : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्या. मात्र, ममता बॅनर्जींच्या या दौऱ्यानंतर राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. थोडक्यात दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर ममता बॅनर्जी महाराष्ट्रातून तर परतल्या. मात्र, जाता-जाता अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या संसारात खडा टाकून गेल्या, असंच काहीसं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ममता यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. मात्र, त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ममता बॅनर्जींना आणि महाविकास आघाडीतील सहकारी घटकपक्षांना उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ‘काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.” अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली’, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलंय.

ममता बँनर्जींच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडणार?

काँग्रेसच्या नेतृत्वाचा मुद्दा देशपातळीवरचा असला, तरी ममता बँनर्जींच्या विधानानं भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचाली घडतील का, याची चर्चा होतेय. म्हणजे भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन काँग्रेसला बाजूला केलं जाईल का? कारण, काही महिन्यांपूर्वी जयंत पाटलांनी काँग्रेसशिवाय सेना-राष्ट्रवादीच्या युतीच्या शक्यतेवर विधान केलं होतं, दुसरीकडे भाजपच्या शेलारांनी सुद्धा शिवसेना आणि पवारांचं कौतुक करुन काँग्रेसला दूर करण्याचं आवाहन केलं होतं.

देशाचा विचार केल्यास भाजप

>> कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, आसाम, मेघालय, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि हरियाणात सत्तेत आहे.

>> दुसरीकडे काँग्रेस राजस्थान, पंजाब, मणिपूर आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत आहे.

>> आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसकडे एकट्या पश्चिम बंगालची सत्ता आहे.

>> एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सध्या प्रमुख पक्षांमध्ये भाजप, नवीन पटनायकांचा बीजू जनता दल, अपना दल आणि नितीश कुमारांची जनता दल (सेक्यूलर) आहे.

>> तर यूपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लालू प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि एआयडीएमकेचा समावेश आहे.

अशावेळी ममता बॅनर्जी यांनी यूपीए अस्तित्वात कुठे आहे असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे आणि त्याला अप्रत्यक्ष दुजोरा देत एनडीएच्या अस्तित्वावर शिवसेनेचे संजय राऊतही प्रश्न करत आहेत.

ज्यांनी राजकीय आयुष्यात एकमेकांची तोंड पाहिली नाहीत, त्या संजय राऊतांची सध्या राहुल गांधींशी सलगी आहे. ज्या पवारांनी नेहमी भाजपविरोधात काँग्रेसला पर्याय मानलं, तेच पवार काँग्रेस नको म्हणणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षालाही महत्वाचं मानतात. आणि एकीकडे महाविकाआघाडीत काँग्रेसच्या स्थानाला भाजपचे शेलार विरोध करतात. दुसरीकडे पवार आणि ममता बॅनर्जीं मिळून काँग्रेसला दूर सारत असल्याचे दावे खुद्द फडणवीस करत आहेत. त्यामुळे राजकारण किती झपाट्यानं बदलतं यांचं चित्र सध्या देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या :

Omicron : ओमिक्रॉनचा धोका; महाराष्ट्र सरकारकडून नवी नियमावली जारी, कुठले नियम पाळावे लागणार?

Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?