राज ठाकरेंसोबत युती करायला भाजपा बिचकतेय का? उत्तर भारतीय मतांचा फटका बसणार? वाचा सविस्तर

| Updated on: Aug 06, 2021 | 5:19 PM

चंद्रकांत पाटील हे राज ठाकरेंची भेट घेतात, त्यानंतर लगेचच युतीच्या चर्चेला सुरुवात होते आणि काही वेळातच फडणवीस हे अशी चर्चाच होत नसल्याचं खोडून काढतात. म्हणूनच भाजपा ही राज ठाकरेंसोबत युती करायला बिचकतेय का असा सवाल निर्माण होतोय.

राज ठाकरेंसोबत युती करायला भाजपा बिचकतेय का? उत्तर भारतीय मतांचा फटका बसणार? वाचा सविस्तर
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेट- संग्रहित फोटो
Follow us on

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली. पाटील स्वत: राज ठाकरेंच्या कृष्णकुंज ह्या निवासस्थानी गेले. तिथंच दोघांची मिटींग झाली. ह्या बैठकीत काही काळ राज ठाकरेंच्या पत्नी आणि मुलगा दोघेही सहभागी झाले. ह्याच भेटीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं. राज ठाकरे हे हिंदुत्वावर काम करतील असं पाटील म्हणाले. (Why is BJP thinking so much to form an alliance with MNS?)

गेल्या काही काळापासून भाजप आणि मनसेत युती होणार अशी चर्चा आहे. पण युतीबाबत अशी कुठलीच चर्चा होत नाहीय असं स्पष्टीकरण फडणवीसांनी केलंय. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे राज ठाकरेंची भेट घेतात, त्यानंतर लगेचच युतीच्या चर्चेला सुरुवात होते आणि काही वेळातच फडणवीस हे अशी चर्चाच होत नसल्याचं खोडून काढतात. म्हणूनच भाजपा ही राज ठाकरेंसोबत युती करायला बिचकतेय का असा सवाल निर्माण होतोय.

1. उत्तर भारतीयविरोधी भूमिका

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महत्वाच्या शहरांमध्ये उत्तर भारतीय समाज हा भाजपाशी प्रामुख्यानं जोडला गेलेला आहे. त्यातल्या त्यात मुंबई ही महत्वाची आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात भाजपचा भर हा उत्तर भारतीय मतांवर आहे. पण राज ठाकरेंच्या राजकारणाची पायाभरणीच उत्तर भारतीयविरोधी भूमिकेनं झालेली आहे. अलिकडच्या काळात ही भूमिका मवाळ केल्याचं दिसतंय. पण रस्त्यावर मारहाण करण्यापासून ते जाहीर सभेत उत्तर भारतीयांचे राज ठाकरेंनी काढलेले वाभाडे सहज विसरले जातील का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच राज ठाकरेंसोबत युतीचा विचार करताना भाजपाची संभ्रम अवस्था होतेय का याचीही चर्चा सुरु झालीय.

2. मराठी मतांचं काय होणार?

मुंबईत शिवसेनेचं बळ मुळातच इथला मराठी माणूस आहे. त्यांच्याच बळावर शिवसेना वर्षानुवर्ष मुंबई पालिकेत सत्तेवर आहे. भाजपचे उत्तर भारतीय मतं आणि शिवसेनेचे मराठी मतं, यातूनच मुंबई पालिका युतीकडं कायम राहीली. त्यातही शिवसेनेचा वरचष्मा राहीला तो सेनेनं जपलेल्या शाखेच्या नेटवर्कमुळे. पण भाजपा-सेना वेगळे झाले. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी सेनेला मुंबईत टक्कर देणं सहज शक्य नाही. त्यांना मराठी मतांची गरज पडलेच. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार भाजपातला एक गट करतोय. पण मराठी मतं खरोखरच राज ठाकरेंमुळे भाजपाला मिळणार का? की मराठी मतं तर सोडाच पण असलेली उत्तर भारतीय मतही हातातून गेली तर काय? असं दुहेरी संकट भाजपासमोर दिसतंय.

3. राज ठाकरेंचं हिंदुत्व!

राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यावर काम करतील असं मोठं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. पण म्हणजे ते नेमकं काय करतील हा सवाल अनुत्तरीतच आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेत भरलेलं हिंदुत्व आणि भाजपाचं हिंदुत्व हे एकच असल्याची गल्लत अनेक हिंदी भाषिक पत्रकार करतात. पण ह्या दोन्हीत मोठा फरक आहे. शिवसेनेच्या हिंदुत्व अजेंड्यात मुस्लिमविरोध होता पण तोच एकमेव असा केंद्रबिंदू कधीच नव्हता. राज ठाकरेंनी स्वत:चा झेंडा बदलला. तो भगवा केला. पण म्हणून शिवसेनेशी जोडलेली मराठी मतं लगेचच त्यांच्या पारड्यात जातील असं समजणं घाईचं ठरेल. कारण राज ठाकरेंनी घेतलेली उत्तर भारतीयविरोधी भूमिका तावूनसुलाखून निघाली. महाराष्ट्रानं त्या बदल्यात राजना दोन आकडी आमदारही दिले. राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा मात्र अजून महाराष्ट्राच्या गळी उतरणं तसं बाकी आहे. (Why is BJP thinking so much to form an alliance with MNS?)

4. पुणे, नाशकात काय होणार?

राज ठाकरेंनी पुणे आणि नाशिकच्या फेऱ्या आता वाढवल्यात. त्यातल्या त्यात त्यांनी पुण्यावर चांगलच लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. प्रत्येक आठवड्यात ते पुण्यात आहेत. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची नाशकातही भेट झालेलीच होती. राज ठाकरेंचा भाजपला किती फायदा, किती तोटा याचं गणित चंद्रकांत पाटलांच्या डोक्यात आहेच. त्यामुळेच त्यांनी पुण्यात फायदा तर मुंबईत फटका बसेल की काय अशी साशंकता व्यक्त करणारं वक्तव्य काही दिवसांपुर्वी केलेलं होतं. ते वास्तववादी आहे.

राज ठाकरेंचा पुणे, नाशकात भाजपला चांगला फायदा होऊ शकतो असं स्थानिक जाणकारांनाही वाटतं पण दुसरीकडे मुंबईत मात्र त्याबाबत साशंकता आहेच. त्यामुळेच मुंबईसह सगळीकडेच मनसेसोबत युती होणार की त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल असे काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत.

5. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका

राज ठाकरे आणि भाजपा यांच्या युतीची ज्या ज्या वेळेस चर्चा होईल त्या त्या वेळेस राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ह्या वक्तव्याचीही होणार. कारण मोदींच्याविरोधात महाराष्ट्रात एवढ्या प्रभावीपणे कुणीच भूमिका पार पाडली नव्हती. त्यावेळेसची त्यांची ही भूमिका आघाडीधार्जिनी आणि भाजपविरोधी मानली गेली. त्याचा मतांमध्ये किती फायदा झाला हा वेगळा मुद्दा आहे. पण राज ठाकरेंच्या भूमिका काही काळानंतर सातत्यानं बदलत गेलेल्या दिसतात. मग मोदींची केलेली स्तुती ते त्यांच्याविरोधात व्हिडीओ लावून केलेला प्रचार असो की, भुजबळांवर आधी गंभीर आरोप ते नंतर राष्ट्रवादीशी जवळीक. उत्तर भारतीयांविरोधात आक्रमकपणे घेतलेली भूमिका ते आता अजेंड्यावरच नसलेला परप्रांतीयांचा मुद्दा. त्यांच्या याच भूमिकेमुळे मतदारही त्यांच्याबाबत धरसोड करताना दिसतोय. म्हणून राज ठाकरेंचा भाजपला किती फायदा होणार आणि भाजपचा राज ठाकरेंना किती होणार हा औत्सुक्याचाच विषय आहे.

संबंधित बातम्या :

मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच आहे; बाळा नांदगावकरांनी दिले युतीचे संकेत

फडणवीस म्हणतात, राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, मग चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर का?

Why is BJP thinking so much to form an alliance with MNS?