
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. दिलीप जोशी यांनी फक्त 45 दिवसांत 16 किलो वजन कमी केलं होतं. तेसुद्धा कोणतंही कडक डाएट किंवा कठीण जिम रुटीन न पाळता त्यांनी हे शक्य करून दाखवलं होतं.

चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करायचं होतं. त्यासाठी ते दररोज 45 मिनिटं धावायचे. 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ते काम संपल्यानंर जवळच्या स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलायला जायचे. त्यानंतर तिथून ते मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलपर्यंत धावत जायचे. पावसातही त्यांनी धावण्याचं हे रुटीन थांबवलं नव्हतं.

ओबेरॉय हॉटेलपासून ते धावत परत यायचे. अशाप्रकारे ते दररोज 45 मिनिटं जॉगिंग करायचे आणि हा त्यांच्या रुटीनचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला होता. जवळपास दीड महिना हे रुटीन पाळल्यानंतर त्यांनी 16 किलो वजन कमी केलं होतं. त्याचप्रमाणे यादरम्यान त्यांनी जलेबी आणि फाफडासारखे पदार्थ खाणं टाळलं होतं.

कोणत्याही ट्रेन, विशेष डाएट आणि सप्लीमेंट्सशिवाय त्यांनी हे वजन कमी केलं होतं. एखादी गोष्ट ठरवली आणि त्याप्रती समर्पण भावनेनं काम केलं की सर्व शक्य होतं, याचं उदाहरण त्यांनी चाहत्यांसमोर निर्माण केलं.

दिलीप जोशी हे गेल्या 17 वर्षांपासून 'तारक मेहता..' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या एक्झिटची चर्चा होती. परंतु त्यात काही तथ्य नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं होतं.