
बॉलिवूडमध्ये काही चित्रपट आणि त्यातील गाणी अशी आहेत जी काळाच्या ओघातही कधीच जुनी झाली नाहीत. अनेक दशकं उलटून गेली तरी ही गाणी ऐकताना मन पुन्हा त्या काळात रमून जातं. 80 च्या दशकातील रोमँटिक गाणी आजही रसिकांच्या मनावर राज्य करताना दिसतात.

1983 साली प्रदर्शित झालेल्या ‘सौतन’ या चित्रपटातील एक गाणं हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर, रोमँटिक गाणं म्हणून ओळखलं जातं. लग्नाचा विचार, प्रेमातली ओढ आणि मनात दडलेली भावना या सगळ्यांचं अतिशय साधं पण प्रभावी मांडणी या गाण्यात पाहायला मिळते.

आजही जेव्हा प्रेमगीतांची चर्चा होते, तेव्हा ‘शायद मेरी शादी का ख्याल’ या गाण्याचा उल्लेख हमखास केला जातो. या सुपरहिट गाण्याला हिंदी सिनेमातील दिग्गज गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांच्या सुरेल जुगलबंदीमुळे हे गाणं अधिकच हृदयस्पर्शी बनलं.

हे गाणं बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि लोकप्रिय अभिनेत्री टीना मुनीम यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. दोघांची केमिस्ट्री आणि गाण्यातील भावनात्मक सादरीकरण यामुळे हे गाणं आणखी लक्षात राहणारं ठरलं. राजेश खन्नांचा रोमँटिक अंदाज आणि टीना मुनीमचा साधेपणाने या गाण्याला वेगळीच उंची दिली.

‘सौतन’ हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर तो मोठा हिट ठरला. हा चित्रपट राजेश खन्नांच्या करिअरसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

चित्रपटातील जवळपास सर्वच गाणी लोकप्रिय झाली होती आणि गाण्यांच्या यशाचा थेट परिणाम चित्रपटाच्या लोकप्रियतेवरही झाला.

आजही ‘शायद मेरी शादी का ख्याल’ हे गाणं ऐकताना प्रेमाची गोड आठवण, लग्नाचं स्वप्न आणि मनातली हळवी भावना पुन्हा जागी होते. म्हणूनच हे गाणं फक्त 80 च्या दशकापुरतं मर्यादित न राहता, आजच्या पिढीतही तितकंच लोकप्रिय आहे.