
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या लोकप्रिय मालिकेत असुरीशक्तींच्या वर्चस्वासाठीचा संघर्ष आता अधिक गहिरा होत असून देवी तुळजाभवानीचा शोध घेत माया थेट छोट्या जगदंबाच्या घरी पोहोचणार आहे. गंगाईच्या मांडीवर विसावलेली बाल जगदंबा, शांत मंगलमय वातावरण... पण अचानक माया या असुरीशक्तीचा प्रवेश तिथे होतो आणि त्या वातावरणाला एक भीतीदायक कलाटणी मिळते.

“ह्यांना तर झोपवलं... आता तुझा काळ जवळ आलाय, तुळजा”, असं म्हणत माया तिची असुरीशक्ति प्रकट करते. मात्र तिच्या मार्गात अनेक दैवी त्रिशूल उभे राहतात आणि घराभोवती दैवी तेज पसरतं. दरवाजा उघडतो आणि जगदंबा तेजस्वी रूपात समोर येते.

“ही ताकद माझी नाही, माझ्या आईच्या अंगाईची आहे” आणि यामुळेच संतापून माया जगदंबाला आव्हान देताना म्हणते, “इथून तुला मी घेऊनच जाणार, मला कमी लेखू नकोस.” मात्र त्यानंतर घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी आणि जगदंबाने निर्माण केलेले आव्हान यामुळे पुढे काय होणार ही उत्सुकता निर्माण होते.

माया म्हणजेच षड्रिपूंमध्येली एक आहे. ‘माया शक्तिशाली रूपात प्रकट झाली आहे. लोभ, क्रोध, मोह, मत्सर, मद आणि माया या षड्रिपूंच्या प्रभावाने आणि त्यांना नियंत्रित केल्याने महिषासुर अधिक बलशाली झाला आहे. यामुळे बाल जगदंबेच्या मार्गातील अडथळे अधिकच वाढताना दिसत आहेत.

ही ‘माया’ केवळ षड्रिपूंतील एक नसून ती संपूर्णसृष्टी उध्वस्त करू शकते. त्यामुळे तिचं बलाढ्य मायावी आव्हानं आणि देवीच्या भक्तीचा अद्वितीय प्रवास यांचा संगम येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.

या अत्यंत क्रूर आणि विध्वंसक शक्तींच्या सहकार्याने महिषासुर आपल्या अंतिम उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ पोहोचत आहे. माया... जिची लीला साक्षात भ्रम निर्माण करू शकते. जी आपल्या सावलीतूनही माणसांची ओळख मिटवू शकते. माया... जिचा खेळ भलत्या-भलत्यांना चकवतो. अशा यामायामुले आता बाल जगदंबेला स्वतःच्या अस्तित्वाचाच सामना करावा लागणार आहे. त्यातून निर्माण होणारा संघर्ष हा अभूतपूर्व असेल.