
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचं नातं फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तसतशी त्या दोघांची मैत्री मजबूत होत आहे.

अमोलशी बोलल्याने अर्जुनच्या मनातील कडवटपणा कमी होऊ लागला आहे आणि तो अप्पीला एक संधी देण्याचं ठरवतो. त्यासाठी अर्जुन अप्पीच्या घरी भेटीला गेला असता त्याला तिकडे आलेले सरकार आणि रुक्मिणी दिसतात. हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते.

अप्पी अजूनही तशीच आहे हे कळताच तो मागे फिरतो. इकडे अमोलचा वाढदिवस जवळ आला आहे आणि अप्पीची इच्छा आहे की अर्जुनला अमोलच्या वाढदिवसाला बोलवावं. ती त्यासाठी तयारी करते आणि गायतोंडेला अर्जुनची माहिती काढायला सांगते.

अर्जुन आणि अमोलची मैत्री वाढत चालली आहे. अमोल आईने दिलेला डब्बा अर्जुनला खायला देतो आणि स्वतः आवडीचं चायनीज, पिझ्झा आणि बर्गर खातो. अर्जुन त्याचे सगळे लाड पुरवतोय. अमोलच्या वाढदिवसादिवशी मात्र अप्पी अमोलला त्याच्या बाबाबद्दल सगळं सांगते.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अमोलला त्याच्या वाढदिवशीच बाबांची भेट मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.