Manoj Jarange Patil : ‘फडणवीसांनी काय केलं हे तुम्ही पण..’ जरांगेंच्या शेजारी बसून प्रसाद लाड अत्यंत गोड शब्दात नेमकं मुद्याचं बोलले
Prasad Lad-Manoj Jarange Patil : "वाक्य, संभाषणात मनोज दादांबरोबर वाद झालेत हे मान्य करतो. परंतु ही गोष्ट सुद्धा मान्य करतो की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासून जो लढा सुरु झाला. त्यामध्ये आरक्षण जे मिळालं, ते माझा भाऊ, समाजाचे बंधु मनोजदादा पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षण समाजाला मिळालं. त्यासाठी मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो" असं आमदार प्रसाद लाड म्हणाले.

"ज्या ज्या वेळेला माझे, त्यांचे तात्विक मतभेद झाले. त्यांनी माझ्यावर, मी त्यांच्यावर आगपाखड केली असेल. माझं तात्विक मत एकच होतं, राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी समाजासाठी जे केलं, त्या 70 वर्षाच्या इतिहासात मराठी समाजाच्या कुठल्याही नेतृत्वाने केलं नाही" असं प्रसाद लाड म्हणाले.

"मग कुठला तरी गरैसमजाचा विषय निघाला, मी दादांना प्रत्येकवेळेला विनंती केली की, तुम्ही पण देवेंद्र फडणवीसांना समजून घेतलं पाहिजे. त्यांनी काय केलं हे तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे. कालच्या प्रेसमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समाजासाठी अनेक गोष्टी केल्या" असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

"दादांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं, त्यावेळी मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आवाहन केलं की, दादा गरमीचा काळ आहे. 30 मे मला चुकीची तारीख वाटते. पेरणीचा काळ आहे. उन्हाळा आहे. मुलांच्या शाळांना सुट्टी आहे.समाजाकडची काही लोकं गावाकडे गेली असतील. आता आंदोलन करु नये. सरकारने काय केलं, ती आकडेवारी सुद्धा आणली आहे" असं प्रसाद लाड म्हणाले.

"सात-आठ गोष्टी झाल्या,नाही झाल्या. दादांनी आवाहन केलं, प्रसादभाऊंनी मला माझा भाऊ म्हटलय. मी कुठल्या कॅपेसिटीत आमदार, नेता म्हणून आलेलो नाही. माझे काका-काकू सीरियस आहेत, हॉस्पिटलला आहेत. काल मी तिथे होतो. काल रात्री संभाजीनगरला आलो. तुम्ही मला जे निमंत्रण दिलं, ते स्वीकारुन मी आज इथे आलो" असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

"एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, समाजामुळे आमदार झालो. तुमच्यामुळे समाजाला देशात मान मिळाला. तुमचा मला व्यक्तिगत सत्कार करायचा होता. तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही विषय मांडले जातात, काही विषयांची ग्वाही दिली जाते. काही विषय अडून राहतात ते अडलेले विषय काय आहेत? माझ्या माध्यमातून आपल्याला काही मदत होऊ शकते का? मी तुमचा दूत बून शकतो का?" असं प्रसाद लाड म्हणाले.