
अध्यात्मिक शांतता आणि हिमालयातील निसर्गसौंदर्याचे प्रतीक असलेली चारधाम यात्रा यंदा लवकर सुरू होणार आहे. आता चारधामची यात्रा करणाऱ्या भाविकांची प्रतीक्षा संपली आहे. नुकतंच बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या मुहूर्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच या यात्रेबाबतचे सविस्तर तपशील समोर आला आहे.

उत्तराखंडमधील भगवान विष्णूंचे निवासस्थान मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:४० वाजता (अंदाजित वेळ) उघडले जातील. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर टिहरीच्या महाराजांच्या कुंडलीनुसार ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीया आहे. याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री या पहिल्या दोन धामांचे दरवाजे उघडले जातात, ज्यामुळे अधिकृतपणे चारधाम यात्रेला सुरुवात होते. २०२५ मध्ये ही यात्रा ३० एप्रिलला सुरू झाली होती. यंदा ११ दिवस आधीच दरवाजे उघडल्यामुळे मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

परंपरेनुसार, बद्रीनाथची तारीख वसंत पंचमीला ठरते, तर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात निश्चित केली जाते. २०२५ मध्ये यात्रेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. तसेच सीमेवरील काही तणावांच्या बातम्यांमुळे पर्यटनावर परिणाम झाला होता.

यंदा मात्र हवामानाचा अंदाज घेऊन अर्ली वार्निंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प आणि 'ऑल वेदर रोड'च्या कामांमुळे यंदा प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने आतापासूनच दरडी कोसळणाऱ्या जागांची डागडुजी सुरू केली आहे.

तसेच यंदाही भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असण्याची शक्यता आहे. यामुळे गर्दीचे नियोजन करणे सरकारला सोपे जाते. अधिकृत पोर्टल लवकरच सुरू होईल.