सीमेवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट पाकिस्तानालाच इशारा; म्हणाले..
पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. अगदी पाकिस्तानमध्ये आवाज पोहचला पाहिजे इतक्या मोठ्याने जयघोष करा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना दिलं. परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला!

आम्ही पुणेकर संस्था, 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आणि तो दिवस आला! अखेर भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला.

पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. अगदी पाकिस्तानमध्ये आवाज पोहचला पाहिजे इतक्या मोठ्याने जयघोष करा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना दिलं. परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला!

या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचं लक्ष पुतळ्याकडे वेधलं आणि म्हणाले, "अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज इथे असल्याने शत्रू इथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही".

ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे 1800 ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला याला मोठे महत्व आहे. याठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिर येथे जी 20 परिषद घेतली, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.