Photo Gallery : नुकसानीची अवकाळी, काढणीला आलेली पीके भुईसपाट, रात्रीतूनच झालं होत्याचं नव्हतं..!
लासलगाव :पोषक वातावरण, मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमध्ये बदल यामुळे शिवार कसा बहरत होता. यंदा खरिपात नुकसान झालं तरी रब्बीत त्याची कसर भरुन निघणार असंच काहीसं चित्र सबंध राज्यात होतं. उत्पादन वाढीची स्वप्नही शेतकऱ्यांना पडू लागली होती. मात्र, अवकाळी पावसाची नजर लागली आणि एका रात्रीत सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं. नाशिकसह सबंध उत्तर महाराष्ट्रात पावसाची अवकृपा सुरुच आहे. अवकाळी ही काही घटकापूरती असते यंदा मात्र भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात झालेल्या पावसामुळे कांदा गहू, मका सह इतर पीक यात जमीनदोस्त झाले असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची धडपड : घटकेच्या पावसाने चार महिन्याची मेहनत वाया जाऊ नये म्हणून काढणी झालेला गहू सुरक्षित रहावा म्हणून शेतकरी प्रयत्न करीत आहे. मात्र, असेच सातत्य राहिले तर नुकसान अटळ आहे. निसर्गाशी अशाप्रकारे दोन हात केले जात आहेत.


मका जमिनदोस्त : जनावरांना चारा आणि उत्पादनाच्या उद्देशाने यंदा मक्याचे क्षेत्रही वाढले होते. शिवाय पाणी आणि पोषक वातावरणामुळे मकाची वाढही जोमात झाली होती. पण वादळी वाऱ्यामुळे हे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

आता भरपाईची मागणी: रात्रीच्या सुमारास आलेल्या पाऊसाने काढणीस आलेला कांदा,गहू ,मका पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत एक ना एक संकटात शेतकरी भरडला जात असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची वेळ बळीराजावर आली असून झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

गहू काळवंडला: रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी ही पिके काढणीला आलेली आहेत. असे असताना गेल्या दोन दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे या परिसरातील आता गहू काळवंडला असून त्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे.