राज ठाकरे यांनी सांगितलेल्या मुंबईतल्या 4 मृत नद्या कुठल्या ? एका नदीत तर एकेकाळी मगरी होत्या
मुंबई शहरात एकेकाळी नद्या खळाळून वाहत होत्या. ओशिवरा, पोईसर आणि दहिसर ही उपनगरांची नावे नद्यांवरुन पडली आहेत. या नद्यांची अवस्था नाल्याहून बत्तर आहे. पर्यावरणवाद्यांनी आणि वैज्ञानिकांनी या नद्यांचं वर्णन 'बायोलॉजीकली डेड' म्हणजेच 'जैविकदृष्ट्या मृत' असे केले आहे. ज्याचा उल्लेख गुढी पाडव्याला राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या भाषणात केला आहे.

दहिसर नदीची लांबी 12 किलोमीटर असून श्रीकृष्ण नगर - कंदार पाडा - संजय नगर - दहिसर गावठाण - मनोरी खाडीमार्गे - अरबी समुद्राला मिळते.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या तुळशी तलावातून दहिसर नदी उगम पावते. उत्तर-पश्चिम वाहणारी ही नदी ज्या उपनगरातून ती वाहते त्याचं नाव दहिसर आहे. साल 1960 पर्यंत या नदीत मगरी होत्या असं म्हटलं जातं.

संपूर्ण मुंबई शहर हे 400 चौरस किलोमीटर परिसरात असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या एक चर्तुर्थांश म्हणजे 104 चौरस किलोमीटर आहे. संजय गांधी उद्यान हा चमत्कार मानला जातो. हा भाग जैवविविधतेने नटला असून इथून उगम पावलेल्या नद्या कांदळवन क्षेत्रातून प्रवास करत अरबी समुद्राला मिळतात.

मिठी नदीचा उल्लेख दरवर्षी पावसाळ्या पूर्वी होत असतो. या नदीमुळे 26 जुलै 2005 चा पुर आला होता.या नदीची लांबी - 25 किमी आहे. मिठी नदीचा मार्ग - विहार तलाव - साकी नाका - कुर्ला - कालिना - वाकोला - बीकेसी - धारावी - माहीम खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळतो.

मुंबईत एकेकाळी दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी या चार नद्या होत्या. या चारही नद्यांचा उगम मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून होतो

पोईसर नदीची लांबी 7 किलोमीटर असून तिचा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मार्वे खाडीमार्गे ते अरबी समुद्र असा आहे. ओशिवरा नदी प्रमाणे ही नदी देखील छोटी आहे. प्लास्टीकचा कचरा आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा नदीला पडल्यानं काही ठिकाणी नदीचं पात्र शोधावे लागते.

ओशिवरा नदीची लांबी 7 किलोमीटर असून तिचा मार्ग - आरे मिल्क कॉलनी - स्वामी विवेकानंद रोड - मालाड जवळील खाडीमार्गे ते अरबी समुद्र असा आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आरे मिल्क कॉलनीजवळून ओशिवरा नदीचा उगम होतो. गोरेगाव उपनगरातून प्रवास करत ही नदी मालाडच्या खाडीपर्यंत पोहोचते.