
सध्या धुरंधर या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने केलेली भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने रहमान डकैत हे पात्र साकारले आहे. त्याने हे पात्र पडद्यावर अगदी जिवंत केले आहे. म्हणूनच आज सगळीकडे त्याची वाहवा होत आहे.

अक्षय खन्ना हा कोणत्याही चौकटीत न बसणारा अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर नाही. तो चित्रपटात भूमिका साकारतो आणि गायब होऊन जातो. त्याला वाचायला, चित्रपट पाहायला आवडते. तो सोशल मीडियावर नसला तरीही आज इंटरनेटवर मात्र त्याचाच बोलबाला आहे.

अक्षय खन्नाने फारच कमी वेळा मुलाखत दिलेली आहे. धुरंधर चित्रपटाच्या चर्चेमुळे त्याची एक जुनी मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने या मुलाखतीत धर्मावर तसेच आपले वडील विनोद खन्ना यांनी ओशो यांच्या आश्रमात जाण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे.

या जुन्या मुलाखतीत अक्षय खन्नाने धर्मावर भाष्य केले होते. मी कोणत्याही धर्माला मानत नाही. मी फक्त देवाला मानतो. मी एखादा तत्त्ववेत्ता नाही. मला कोणत्याही गोष्टीचा शोध घ्यायचा नाही, असे मत अक्षय खन्नाने व्यक्त केले होते.

विनोद खन्ना यांनी घेतलेल्या संन्यासावरही अक्षय खन्नाने भाष्य केले होते. 'त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे माझ्या वडिलांचे आयुष्यच बदलून गेले. त्यावेळेला त्यांना संन्यास घेणेच फार गरजेचे वाटले असेल. त्यावेळी मी फक्त पाच वर्षांचा होतो. मला त्यावेळी हे सगळं समजून घेणं फार कठीण होतं. आता मला हे सगळं समजत आहे,' असे अक्षय खन्ना म्हणाला होता.