Vande Bharat : वेगवान, चकचकीत वंदे भारत ट्रेनने प्रवास करता, पण त्याचा खरा मालक कोण ? तुम्हाला माहीत आहे का हे उत्तर?
वंदे भारत सारख्या जलद गाड्या कुठे बनतात, त्या कोणाच्या मालकीच्या आहेत, पण त्याचे आर्थिक व्यवस्थापन कोण करतं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा.

आपण ज्या वेगवान, चकचकीत, वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करतो, त्याचा खरा मालक कोण आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ती थेट भारतीय रेल्वेच्या मालकीची आहे की की त्यामागे दुसरी काही कथा आहे? चला जाणून घेऊया..

वस्तुस्थिती अशी आहे की या गाड्या भारतीय रेल्वेच्या आहेत आणि त्या भारत सरकारच्या अखत्यारीत येतात. या गाड्या भारतातच चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) आणि इतर कारखान्यांमध्ये बनवल्या जातात. हे 'मेक इन इंडिया'चे एक उत्तम उदाहरण आहे.

मग तुमच्या मनात असाही विचार आला असेल की रेल्वे दरवर्षी कोट्यवधी रुपये भाडे का देते ? इथेच एंट्री होते ती भारतीय रेल्वे वित्त महामंडळाची (IRFC). IRFC ही एक सरकारी कंपनी आहे जी विशेषतः भारतीय रेल्वेसाठी निधी उभारते. याला रेल्वेचा वित्त भागीदार म्हणजेच फायनान्स पार्टनरही म्हणता येईल. ही कंपनी बाजारातून बाँड आणि डिबेंचरद्वारे सार्वजनिक आणि मोठ्या कंपन्यांकडून पैसे उधार घेते.

IRFC बाजारातून उभारलेला निधी हा ट्रेन, लोकोमोटिव्ह, कोच आणि ट्रॅक खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वापरला जातो. जेव्हा आयआरएफसी ही मालमत्ता खरेदी करते तेव्हा ती रेल्वेला भाड्याने देते. त्यानंतर रेल्वे दरवर्षी भाडे देते. या भाड्याला लीज रेंटल म्हणतात.

या प्रणालीमुळे रेल्वेवर एकाच वेळी मोठा आर्थिक भार पडत नाही. जर रेल्वेला एकाच वेळी सर्व काही खरेदी करावे लागले तर तो खूप मोठा भार असेल. भाडेपट्टीमुळे हा भार कमी होतो. त्याच वेळी, रेल्वेला नवीन गाड्या आणि पायाभूत सुविधा लवकर मिळतात, ज्यामुळे आधुनिकीकरण होण्यास मदत होते.

जेव्हा रेल्वे वेगाने विकसित होते, तेव्हा लोकांना नवीन, आरामदायी आणि जलद गाड्या उपलब्ध होतात. वंदे भारत हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच, एक सरकारी कंपनी असल्याने, IRFC बाजारातून कमी व्याजदराने निधी मिळवू शकते, ज्याचा शेवटी रेल्वेला फायदा होतो आणि प्रवाशांना अप्रत्यक्षपणे स्वस्त आणि चांगल्या सेवांच्या स्वरूपात फायदा होतो.