
डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. रोजच्या प्रवासात जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत. याच त्रासाला कंटाळून आणि नागरिकांना होणारा त्रास पाहून एका रिक्षाचालकाने अनोखा पुढाकार घेतला आहे.

डोंबिवली पश्चिम, सुभाष रोड परिसरातील खड्ड्यांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने संतोष मिरकुटे या रिक्षाचालकाने स्वतःच रस्त्यावरील खड्डे मातीने बुजवण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि विशेषतः रिक्षाचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकवताना होणारे अपघात, वाहनांची होणारी तोडफोड आणि त्यातच रोजच्या प्रवासात कंबरेचे व आरोग्याचे इतर त्रास सहन करावे लागत आहेत.

प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. याच परिस्थितीत संतोष मिरकुटे यांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवायला सुरुवात केली.

आम्ही पालिकेला नियमित कर भरतो, पण आम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत. पण प्रशासकीय अधिकारी केवळ एसीमध्ये बसून खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याच्या प्रतिक्रिया देतात, पण प्रत्यक्षात काहीही होताना दिसत नाही, असे संतोष मिरकुटे म्हणाले.

केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी केवळ एसीमध्ये बसून राहण्याऐवजी रस्त्यावर उतरून कामाची गांभीर्याने पाहणी करावी. तसेच या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे. नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

संतोष मिरकुटे यांच्या या कृतीने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रशासनाचे डोळे उघडतील आणि डोंबिवलीकरांना लवकरात लवकर खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुभव घेता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

एक सामान्य नागरिक म्हणून संतोष मिरकुटे यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, नागरिकांचा हा दैनंदिन संघर्ष कधी थांबणार, हाच खरा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.