
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही जातीव्यवस्थेच्या धर्मव्यवस्थेच्या विरोधातली चळवळ होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर धर्माबद्दल बोलताना म्हणतात. माणूस हा धर्मासाठी नसतोच, माणसाने धर्म बनवलाय त्यामुळे साहजिकच धर्म माणसांसाठी आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर बोलणारे या तत्त्वांचे पालन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माणूस सर्वात आधी त्याच्या देशाचा असतो. आपली जात, धर्म, आपण कुठल्या कुटुंबातून येतो, आपली परिस्थिती काय...याहीपेक्षा महत्त्वाचा आहे आपला देश! "सर्वात आधी आणि सर्वात नंतर आपण भारतीय आहोत."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी इतकी चांगली कशी होती? शिक्षण! कुठल्याही पद्धतीचा सल्ला देताना बाबासाहेब आंबेडकरांच्या बोलण्यात शिक्षणावर खूप जोर असायचा. ही उच्च शिक्षित असणारी व्यक्त फक्त तिच्या विचारसरणी, चळवळीसाठीच चर्चेत नव्हती तर शिक्षणासाठी देखील चर्चेत होती. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" असं ते म्हणत, यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.

एखादा माणूस किती मेहनत करतो त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं तो कोणत्या दिशेला जातोय, त्याची मेहनत योग्य दिशेला आहे का? तुम्ही किती अंतर चालताय, किती मेहनत करताय यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही हे सगळं योग्य दिशेला करताय ना?

माणूस खरा घडतो तो विद्यार्थी असतानाच म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, "स्वतःची गुणवत्ता विद्यार्थीदशेतच वाढवा". माणूस विद्यार्थी असताना, शिकत असतानाच स्वतःकडे उत्तम प्रकारे लक्ष देऊ शकतो. विद्यार्थीदशेत गुणवत्ता वाढवली पाहिजे असं ते नेहमी सांगत.