Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार
पुणे : सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशी परस्थिती ओढावली आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. यंदा प्रथमच धरणातील पाण्याचा वापर हा शेती पिकांसाठी होत आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील मांजरा, जायकवाडी प्रकल्पातील पाणी हे शेती पिकासाठी सोडण्यात आले होते. असाच निर्णय पुणे जिल्ह्यातही झाला आहे. येथील वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गरजेच्या वेळी पिकांना मिळाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे.

धरणातील पाण्याचा आधार : यंदा अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी या पावसाचा फायदा रब्बी हंगामात झाला आहे. धरणात सरासरीपेक्षा अधिकचे पाणी असल्याने पिकांना पाणी सोडण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा :वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे करपू लागलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार आहे.

ऊन्हाच्या झळा: वाढत्या उन्हाचा परिणाम उन्हाळी हंगामातील पिकांवर होत आहे. यामुळे पिके सुकू लागली आहेत. शिवाय जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने शेतकरी धास्तावले आहे. गेल्या तीन महिन्यापासून पिकांची जोपासणा करुन आता उत्पादनात घट होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.

यंदा प्रथमच उन्हाळी पिके बहरात : उन्हाळी पिके ही संपूर्ण साठलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. दरवर्षी मार्च महिन्याच जलस्त्रोत हे तळ गाठतात. पण यंदा एप्रिलपर्यंत पाणी टिकून राहिले आहे. आता गरज निर्माण होताच धरणातील पाण्याचा शेतीमधील पिकांसाठी वापर केला जात आहे.