Farmers Schemes: सन्मान निधीपासून ते पेन्शनपर्यंत या योजनांची चर्चा, शेतकऱ्यांना असा मिळतो लाभ
Farmers Schemes: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शनपासून विम्यापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांमुळे त्यांना वेळोवेळी मदत होते. त्यात पीएम किसान योजनेचीच अधिक चर्चा होते. पण इतरही अनेक योजना आहेत, त्याची माहिती अनेकांना नाही. कोणत्या आहेत या योजना?

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करते. तर त्यासोबतच पीक विमा आणि इतर योजनांमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळते. तर पेन्शनसह इतरही योजना आहेत. त्याची माहिती अनेकांना नाही. कोणत्या आहेत या योजना?

PM Kisan ही केंद्र सरकारची योजना आहे. ती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी चांगली योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची वार्षिक मदत मिळते. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये या योजनेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आहे. यामध्ये नैसर्गिक संकट आले. रोगांमुळे पीकांचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई या योजनेत मिळते. या योजनेत खरीप पिके २ टक्के, रब्बी पिके १.५ टक्के, बागायती पिकांना ५ टक्क्यांचा हप्ता द्यावा लागतो.

किसान क्रेडिट कार्ड ही तर शेतकऱ्यांसाठी खास योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यात येते. या योजनेतंर्गत शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला ४ टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.

प्रति थेंब अधिक पीक असं घोषवाक्य असलेल्या या योजनेचं नाव पंतप्रधान कृषी सिंचन योजना असं आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन या सारख्या सुक्ष्म सिंचन प्रणालींवर अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थापन करावे यासाठी ही योजना राबवली जाते.

पंतप्रधान किसान मानधना योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक ऐच्छिक पेन्शन योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येतो. या योजनेत ६० व्या वर्षानंतर शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपयांची पेन्शन मिळते.