विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी
बीड शहरात एका विवाह सोहळ्या दरम्यान फटाक्यांचा जमिनीवर स्फोट झाल्याने पाच फोटोग्राफर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबियाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

विवाह सोहळ्यात बडेजाव करताना साध्या सुरक्षेच्या नियमांची देखील पायपल्ली केली जात आहे. बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका मोठा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी केली. मात्र, फटाक्यांचा एक दारुगोळा फोटोग्राफर्सच्या अंगाजवळ येऊन फुटला.

बीड शहरातील या विवाह सोहळ्यातील आतीषबाजीतील काही फटाके स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अगदी जवळ येऊन फुटले. या भयानक घटनेत पाच फोटोग्राफर्स जखमी झाले.

या दुर्घटनेत अभिषेक कदम या फोटोग्राफर्सच्या डोळ्यांसह चेहरा आणि शरीरही भाजले. यात पाच फोटोग्राफर्स जखमी झाले असले तरी अभिषेक कदम सर्वाधिक जखमी झाले. अभिषेकला संभाजीनगरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. अभिषेक याचा विवाह अवघ्या तीन दिवसांवर आला होता. तोंडाला बँडेज बांधून त्याचा विवाह करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांवर आली.

या संपूर्ण घटनाक्रमानंतर जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले आहे. लग्न आयोजक, इव्हेंट मॅनेजर आणि फायर वर्क्स चालकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढे तरी असा अपघात घडून कोणाचेही आयुष्य उध्वस्त होणार नाही अशी मागणी जखमी फोटोग्राफरचे वडील गोरख कदम यांनी केली आली.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या फोटोग्राफर्सच्या लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणा फोटोग्राफर्सच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली नाही.