ना बँड बाजा, ना थाटामाटात आगमन; गेल्या 150 वर्षांपासून गुपचूप बसवतात हा गणपती; विसर्जन न करण्यामागील रहस्य काय?
ही १५० वर्षांहून जुनी परंपरा श्री गणपती पंचायतन संस्थान जपते. कागदी लगदा गणपतीची मूर्ती दीड दिवसांसाठी बसवून पुढील वर्षी साठवली जाते. ही परंपरा सांगलीच्या एकात्मतेच्या संस्कृतीचे प्रतीक आहे, जिथे 'एकात्मता मंदिर' सर्व धर्मांचे ग्रंथ जपते. नवसाला पावणारा हा गणपती भाविकांचा श्रद्धास्थान आहे.

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सांगली शहरात आज गणरायाचे आगमन झाले. 'चोर गणपती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना अत्यंत गुप्तपणे आणि साधेपणाने पार पडली.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर हा गणपती बसवण्याची ही अनोखी परंपरा आहे. सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या प्रसिद्ध मंदिरात गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे.

सर्वत्र गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होते. मात्र, सांगलीत गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी, कोणालाही न कळवता, कोणत्याही प्रकारचा गाजावाजा किंवा मिरवणूक न काढता या गणेशाची स्थापना होते. त्यामुळेच याला 'चोर गणपती' असे म्हटले जाते.

कागदी लगद्यापासून बनवलेली ही मूर्ती केवळ दीड दिवसांसाठी बसवली जाते. विशेष बाब म्हणजे, या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. त्याला सन्मानाने सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवले जाते, जेणेकरून पुढील वर्षी पुन्हा त्याचा वापर करता येईल.

सांगलीचे श्री गणपती मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नसून, ते एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराच्या परिसरात एक ‘एकात्मता मंदिर’ असून, तिथे सर्व प्रमुख धर्मांचे पवित्र धर्मग्रंथ ठेवण्यात आले आहेत. हा उपक्रम सांगलीच्या सर्वधर्म समभावाच्या संस्कृतीचा गौरव करतो.

चोर गणपतीच्या आगमनानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी येथे नियमित गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात देशभरातून शेकडो भाविक सहभागी होतात.

सांगलीचा हा गणपती 'नवसाला पावणारा' म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामुळेच भाविकांची येथे मोठी गर्दी असते. पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि मिरवणुकीने नियमित गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते, मात्र चोर गणपतीची मूर्ती पुढील वर्षासाठी जपून ठेवली जाते.

राजा विजयसिंह यांच्या नेतृत्वाखालील श्री गणपती पंचायतन संस्थानने ही अनोखी आणि शतकाहून अधिक जुनी परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जपली आहे, जी सांगलीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे.