GK : केवळ RUM च्या निर्मितीमुळे मुंबईतील हे स्थानक अस्तित्वात आले ?
भारताचीच काय तर आशियातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. या पहिल्या मार्गावर मोजकी स्थानके होती. त्यात भायखळा स्थानकाचा समावेश होताच मात्र, दुसरे एक स्थानक होते, ज्याचा रमच्या निर्मितीशी संबंध आहे.

मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या १८५३ साली बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावरती बोरीबंदर या स्थानकानंतर थेट भायखळा स्थानक होते. त्यानंतर दादर, कुर्ला मुलुंड असे कोणतेही स्थानक त्यावेळी बांधलेले नव्हते मात्र, भांडुप स्थानक बांधलेले होते.

भांडुप गावाची लोकसंख्या त्यावेळी फार तर ३०० ते ४०० होती. कारण १८८१ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा ५४४ होती. मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली तेव्हा हे भांडुप गाव इंग्रजांनी लूक अशबर्नर नावाच्या माणसाला भाड्याने दिले.

लुक अशबर्नर हा 'बॉम्बे कुरियर' नावाच्या वर्तमान पत्राचा संपादक होता. त्याला रम बनवण्याची जबाबदारी इंग्रजांनी दिली. त्याने कावसजी नावाच्या मॅनेजरला रम निर्मितीसाठी जुंपले.

त्याकाळी साडे चार लाख लिटर रम तयार होऊन ब्रिटीश सैनिकांना भारतभर पुरविली जायची. ब्रिटीश सैनिकांनी पहिल्या ट्रेनच्या प्रवासात भांडुपला उतरुन या रमचा आस्वाद घेतला आणि ते पुढे निघाले.

त्यानंतर मॉरिशसला स्वस्त रम तयार होऊ लागली. त्यानंतर भांडुप येथील रमचा कारखाना १८५७ ला बंद करावा लागला. पुन्हा तो सुरु करण्याचा प्रयत्न झाला परंतू त्याला यश आले नाही. बॉम्बे गॅझेटच्या बातमील लूक अशबर्नर नावाच्या रमच्या इतिहासाची नोंद उपलब्ध आहे.